ऋतू हिरवा , ऋतू बरवा।

ऋतू हिरवा , ऋतू बरवा।

प्रा.. माधवी महेश पोफळे
उन्हाळ्यात ओकेबोके दिसणारे तपकिरी रंगाचे डोंगर , टेकड्या हळूहळू हिरव्यागार दिसू लागतात ते पहिला पाऊस पडला कीच , झाडावेलींवरची धूळ नाहीशी होऊन हिरवीकंच झालेली झाडे आनंदाने डोलू लागतात .
दरवर्षी सारा निसर्ग मोठ्या उत्साहाने पावसाचे स्वागत करण्यास सज्ज असतो , म्हणूनच इतर ऋतूं पेक्षा मला पावसाळा आवडतो. सर्वत्र हिरवाई असते अनेक ठिकाणी झरे, धबधबे, तलाव ,नद्या भरलेल्या असतात हे सगळं आपण पाहतो तेव्हा प्रसन्न वाटतं. अशाच वेळी अगदी पहाटेच्या वेळी मला आज जाग आली. तशी रोजच लवकर जाग येते, पण आज मात्र अगदी ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडले ते अगदी पूर्ण झोप झाले आहेत याच अविर्भावात. डोळे लक्ख उघडलेले. अलगद वाऱ्याची झुळूक खिडकीतून येत होती, खिडकी उघडी होती त्यापेक्षा जास्त खिडकी उघडली आणि बाहेर नजर टाकली . बाहेर कुट्ट अंधार – झाड , वेली पक्षी, झरे धबधबे सगळेच अजून झोपलेले होते, सर्वत्र नीरव शांतता. घरातील सारेच साखर झोपेत होते. निसर्गातील सगळ्या कळ्या मिटलेल्या होत्या पण खिडकीतून दिसणारा देव चाफा चमकत होता आणि त्याचा सुगंध पहाटेला देखील मोहित करत होता या पहाटेचं आणि फुलांचे काय बरं नातं असावं? हा प्रश्न मनाला स्पर्श करीत होता आणि हाच प्रश्न घेऊन दार उघडून मी बाहेर जाते, चाफ्याच्या झाडांवर पडलेले फुलांचे चांदणं त्याच्या सुगंध काय जादू आहे या निसर्गात! अशा शांत सुगंधी वातावरणात मला फिरायला नेहमीच आवडतं पण त्यापेक्षाही हातात पेन घेऊन मनात येईल त्या भावना उतरवायला ..अशा वातावरणात प्रसन्न मनाने लेखणीला धार आणि विचारांना गती प्राप्त होते हळूहळू उजेड फेर धरत होता, पक्षांचा आवाजही आता कानी येऊ लागला होता, पहाटेच्या स्पर्शाने कळ्यांची होणारी फुले सुद्धा वाट पाहत होते, चाफ्याबरोबर पारिजातकही मला त्याच्या सुगंधी जाळ्यात अडकवत होता . जांभळाचा बहार संपला होता पण नित्य नियमाने त्यावर बसणारा कोकीळ पहाट झाली याची आठवण करून देत होता. इतरही पक्षी एकमेकांच्या कानात कुजबुजू लागले हे सारं मी अनुभवत होते . हळूहळू आता उजेड दिसू लागला पहाटही आकाशात हलकेच पाहूल टाकू लागली निशिगंधाच्या लोभस फुलांना स्पर्शून होणारी अल्हाददायक व लोभस पहाट पाहण्यासाठी गुलाबही सज्ज झाला होता , वेगवेगळ्या रंगाचा लहान मोठ्या आकाराचा गुलाब मी किती गोंडस यासाठी चढाओढ करीत होता. पण, ही सारी निसर्गाची देण हे समजून सांगण्याइतके ते समजदार नाही.
जाई जुईचा वेल रातराणी वर चढला होता रात राणीचे अवसान गळून पडले होते पण जाई जुईने रात राणीचे सौंदर्य कमी होऊ दिलेले नव्हते. बाजूलाच असलेला मोगरा पहाटेच्या किरणाने नाहून निघत होता , अबोली माझ्याकडे पाहून खुदकन हसली जणू तिने अबोला सोडलेला होता. सदाफुली तर कधी रुसली फुगली असेल असे आठवतच नाही जास्वंद आणि झेंडूचा गेंद सकाळच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. थोडं सूर्याने डोकं वर काढावं काय आणि उन्हाची तिरिप दारात यावी काय कमळाच्या फुलांनी तर सादच घातली . यारम्य सकाळी वाऱ्याची झुळूक आली आणि सारे वेली फुले फेर धरून नाचू लागले मीच माझ्या मनात गुणगुणू लागले – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुसरे आळवीती।
असे पावसाळ्यातील देखणे रूप म्हणजे चैतन्याचा परिसच. मनाला उल्हसित करणारे वृक्षवेली, फुले, पाखरे हे खरोखर आपले सोयरे असल्याची अनुभूती आपल्याला पावसाळ्यातच होते

प्रा.. माधवी महेश पोफळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *