नाशिक : देवयानी सोनार
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने कालपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे. दारणा धरण क्षेत्रातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दारणामधूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पावसाने मागील दोन-तीन दिवस उघडीप दिली होती. सर्वत्र कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडले होते. मात्र, काल रात्रीपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाल्याने कालपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरणामध्ये यंदा लवकर पाणीसाठा वाढला आहे. सध्या गंगापूर धरणाचा साठा 65 टक्क्यांच्या वर गेला आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठाही वाढला असून, पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3486 तर दारणातून 7515 क्सूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गोदावरीच्या पातळीत वाढ होऊ लागताच नागरिक आणि या भागातील व्यावसायिक सतर्क झाले आहेत. प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
नांदूरमध्यमेश्वरमधूनही विसर्ग
दारणा आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर परिसरातील शेती गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्यात गेली आहे.