बदलता प्रवाह..

स्वाती पाचपांडे नाशिक

सकाळच्या कामाची खूपशी गडबड आणि काही फोन असे येतात की ते घ्यावेच लागतात..’हॅलो ताई…ओळखले का..तुमच्याकडे माझे काम आहे..तुम्ही काम कराल अशी खात्री आहे..’ कामापुरते मामा बनवणारे हे लोक आपलेच कौतुक ऐकायला नकोसे वाटते..हं..ते पुढे म्हणाले की मी तुम्हाला एक मॅरेज बायोडाटा पाठवला आहे.. माझ्या मामाचा मुलगा आहे लग्नाचा तर तुम्ही अनुरूप मुलगी सुचवा त्यावर मी म्हटले की हो..एकदम तर काही कोणी मुलगी पाहण्यात नाही पण तुम्हाला नक्कीच सांगेन..त्यानंतर ते गृहस्थ बराच वेळ बोलत राहिले..मी मात्र विचारात पडले..न पाहिलेल्या मुलासाठी मी मुलगी पाहावी ही अपेक्षा..आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला वेळ आहे की नाही हे लक्षातच घेतले जात नाही..हेच गृहस्थ महिलांच्या सामाजिक कार्याबद्दल नापसंती व्यक्त करत असतात.. महिलामंडळ आणि सामाजिक कार्य त्यांना फारसे आवडत नाही..पण अशा वेळेस मात्र त्यांना ओळखीचा फायदा करून घ्यायचा असतो..असो..अर्थातच हे सगळं सहजतेने घ्यायचं असतं.. लोकांना आपली उपयुक्तता हवी असते हेच खरे त्यातूनही आपण नेहमीच आपुलकीने समोरच्या समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेत असतो तर असे फोन आपल्या सर्वांनाच येत असतील..स्थळ असेल तर बघा..हो आणि शक्य असेल ती मदत सगळ्यांनी केलीच पाहिजे..असे वाटते अशी जादूची छडी असावी जिने अनुरूप वधुवर शोधून द्यावे..गुणांची पारख असावी लागते समोरच्या व्यक्तीला..अनुरूप स्थळ लक्षात आले तरी दिवसेंदिवस लग्न जमवणे ही एक अवघड गोष्ट होत चालली आहे…विचार करून आपलेही डोके गरगरायला लागते..खरं तर मॅरेज बायोडेटा हा एक कागद असतो..फार वरवरची माहिती त्यात असते आणि तो तुम्ही किती आकर्षक बनवता यावरही ते अवलंबून असते..मुलीकडची काही मंडळी मुलाचा मॅरेज बायोडाटा हातात घेतला की आधी पगाराचा आकडा बघतात मग बाकी कौटुंबिक स्थिती कितीजरी संपन्न असली तरी त्यांना मुलाचे घर आहे का?जबाबदारी कितपत आहे त्याच्यावर इत्यादी इत्यादी असे पाहिले जाते..ह्या गोष्टी मुलीच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच महत्त्वाच्या आहेत हेही मान्य पण थोडीफार तडजोडही करावी लागते..छान छान चौकट असेल तर मुलीला आपले कर्तव्य दाखवायला वाव तर हवा ना..!पूर्वी जसे म्हणायचे आम्ही तर अगदी शून्यातून संसार उभा केला..दोन चमचे आणि एक पातेले होते आणि आता भांडीच भांडी..असे संवाद आता कालबाह्य होणार आहेत..सुरुवातीपासूनच दोघांना संपन्नतेचा धूर लाभणार आहे आता फक्त संसार टिकला पाहिजे असे वडीलधार्‍या मंडळींना वाटते.. मुलीच्या बायोडाटामध्ये देखील त्याच त्या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या जातात.. सर्व गुणसंपन्न उच्चशिक्षित पगार कमावणारी,सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी सून हवी असते..परंतु हा सर्व अपेक्षांचा डोंगर ओलांडत असताना लग्नाचे वय मात्र दोघांचेही वाढत जाते..काही दशकांपूर्वी जे लग्नाचं वय ग्राह्य धरले जायचे ते आता चार ते पाच वर्षांनी पुढे सरकले आहे. साधारण तिशीच्या उंबरठ्यावर त्यांना लग्न करावं असे वाटते तेही मनामध्ये अनेक किंतुपरंतु असतात..अनेक करिअरिस्ट ध्येयवेड्या तरुण-तरुणींशी बोलल्यावर लक्षात येते की त्यांनाही लग्न ही फार आनंददायी बाब वाटत नाही..त्यांना एकटे राहण्याची तसेच स्वतंत्र जीवनशैलीची इतकी काही सवय होऊन जाते की बंधन नकोसे वाटायला लागते आणि मग लग्न का करावे ह्या मूळ प्रश्नाशी ते येतात..अर्थातच समाजाच्या निकोप बांधणीसाठी हा विचार पूरक नाही.. लग्न या संस्थेचे फायदेतोटे जाणून घेण्याइतके ते सुज्ञ नक्कीच असतात..त्यांच्या काही कल्पना स्वच्छ असतात..तेही आपल्याला पटते कारण एकप्रकारे ते स्वतःशीच झगडत असतात आणि नातेवाईकांना मात्र त्यांच्या लग्नाची घाई झालेली असते मग असे स्थळ सुचवणे प्रकार पुढे येतात मग प्रश्न पडतो की आपणही मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांना नातेवाईकांना ओळखतो पण प्रत्यक्ष उपवर मुलगा किंवा मुलगी यांची मानसिकता आपल्याला माहिती नसते किंवा तितका परिचयही नसतो असे असताना आपण त्यांची शिफारस कशी करावी हा प्रश्न पडतो कारण पुढेही लग्न झाल्यानंतर त्यांचे लग्न टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे..लग्न विस्कटले की मध्यस्थ व्यक्तीला जबाबदार धरले जाते..
थोडक्यात काय तर लग्न जमविणे जोखीमेचे काम आहे..वाटते तितके सोपेही नाही..अर्थात कधी कधी सहजासहजीही लग्ने जुळत असतात..ज्याला जे हवे ते लाभो अशा सदिच्छा आपण द्यायच्या असतात हे मात्र नक्की..!
स्वाती पाचपांडे नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *