ग्रामपंचायतींत सत्ताधारी आणि विरोधक ‘फिफ्टी-फिफ्टी’ 

 

ग्रामपंचायत निवडणुकांत आपलीच सरशी झाल्याचा दावा भाजपा-शिवसेना शिंदे गट युतीने केला असून, तोच दावा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचाही आहे. दोन्ही दाव्यांना अधिकृत आधार नाही. ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नसल्याने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून पक्षीय पातळीवर निकाल जाहीर केले जात नसल्याने राजकीय पक्ष आपआपल्या अंदाजानुसार दावे करतात. भाजपा-शिंदे गट युती आणि महाविकास आघाडी यांनी ग्रामपंचायत पातळीवर समझौता करुन निवडणुका लढविल्या होत्या, यालाही काही आधार नाही. गावपातळीवर स्थानिक गटही कार्यरत असतात. एका गटात अनेक पक्षांचे कार्यकर्ते सामावलेले असतात. त्यामु़ळे राजकीय पक्षांना महत्व प्राप्त होत नाही. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे गावपातळीवरील नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधातही लढले. भाजपा आणि शिंदे गट यांच्यातही तसेच घडले. मात्र, निवडणुकांनंतर युती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपले जास्त सरपंच आणि सदस्य निवडून आल्याचे दावे करुन लाडू आणि पेढे वाटले. दोघांचेही दावे मान्य केले, तर ‘फिफ्टी-फिफ्टी’ यश पदरात पडल्याचे म्हणता येते.

 

भाजपा-शिंदे गट काकणभर सरस

 

राज्यातील ७,६८२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यामध्ये सरपंचांची थेट निवड करण्यात आली. यापैकी २४८२ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ८४२ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावाही भाजपाने केला. हा दावा मान्य केला, तर ७६८२ पैकी ३३२४ ग्रामपंचायती या युतीने जिंकल्या. यावरुन युतीला ४३.२६ टक्के यश मिळाल्याचे म्हणता येते. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला १५२३, काँग्रेसला १००१ आणि शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ७२६ ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचा दावा करण्यात आला. यावरुन महाविकास आघाडीला ४२.६१ टक्के यश मिळाले आहे. ही आकडेवारी पाहता भाजपा-शिंदे गट युतीला महाविकास आघाडीपेक्षा कांकणभर यश अधिक मिळाले असले, तरी काही इकडे-तिकडे केले, तरी राज्यातील सताधारी आणि विरोधक यांच्या वाट्याला समसमान यश आले आहे.

प्रत्यक्ष यशापेक्षा दावे अधिक

 

महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सादर केलेली आकडेवारी जरा वेगळीच आहे. भाजपा आणि शिंदे गटाचे ३०१३ व अपक्ष व इतरांचे १३६२ सरपंच निवडून आले. यामध्ये ७६१ सरपंच हे महाविकास आघाडीशी संबंधित असल्याचा, दावा पवार यांनी केला आहे. त्यांचा दावा मान्य केला, तर इतरांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाशी संबंधित सरपंचही असू शकतात. अपक्ष आणि इतरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्षांचा समावेश आहे. अपक्ष आणि इतरांना १३६२ ग्रामपंचायती मिळाल्या असतील, तर त्यांच्या यशाचे प्रमाण १७.८५ टक्के भरते. भाजपा-शिंदे गटाचे ४३.२६ टक्के यश, महाविकास आघाडीचे ४२.६१ टक्के यश आणि अपक्ष व इतरांचे १७.८५ टक्के यश ग्राह्य धरले, तरी बेरीज १०० टक्के भरत नाही. यावरुन करण्यात आलेले दावे प्रत्यक्ष यशापेक्षा अधिकच आहेत.

 

स्थानिक स्वराज्य निवडणुकांत चुरस

 

सत्ताधारी आणि विरोधक यांनी केलेल्या दाव्यांचा कल असाच राहिला, तर राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होतील, असेच संकेत मिळतात. या निवडणुका आघाडी, युती करुन किंवा न करताही लढविल्या गेल्या, त्या चुरशीच्याच होतील, असेही संकेत मिळतात. ग्रामपंचायत निवडणुकांत मतदान करणारे नागरिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही  मतदान करत असल्याने, त्यांचा हाच कल कायम राहील, असे गृहीत धरले, तर निकालात फारसा फरक पडणार नाही. शहरी मतदारांची मानसिकता ग्रामीण मतदारांच्या तुलनेत वेगळी असल्याने महानगरपालिका निवडणुकांत वेगळे चित्र दिसण्याची शक्यताही गृहीत धरता येते. काहीही असो, ग्रामपंचायत निवडणुकांतील कल लक्षात घेऊनच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *