पिंपळगाव-निफाड परिसरातील संवेदनशील उपक्रमाला यश
निफाड : विशेष प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंतच्या गजबजलेल्या रस्त्यांवर रोज भीक मागत दिसणार्या दोन भेदरलेल्या मुलींच्या आयुष्यात एक अनपेक्षित, पण आशादायी वळण आले. नशेच्या गर्तेत हरवलेल्या आईमुळे आधार, संरक्षण आणि ओळख या तिन्ही गोष्टींपासून वंचित झालेल्या या मुलींच्या परिस्थितीकडे काही संवेदनशील नागरिकांनी पाहिले आणि पुढे येऊन मानवतेचे एक सुंदर उदाहरण घडवले.
पिंपळगावचे गणेश शेवरे, उद्धवराजे शिंदे आणि गोकुळ खैरनार यांनी या मुलींची दयनीय अवस्था पाहताच तत्काळ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्याकडे माहिती पोहोचवली.
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन तिवारी यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक त्या कार्यवाहीला सुरुवात केली. या दोन्ही मुलींना तत्काळ संरक्षण मिळण्यासाठी त्यांना सैंगऋषी अनाथ वृद्धाश्रम, लौकी (ता. येवला) येथे दाखल करण्यात आले. आश्रमाचे संस्थापक नवनाथ नारायण जर्हाड यांनी कोणताही भेदभाव न करता मायेच्या आस्थेने दोन्ही मुलींना स्वीकारले. मात्र, खरी अडचण होती ओळख निर्माण करण्याची. जन्मदाखला नसणे, कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसणे यामुळे शिक्षणाच्या दारात प्रवेशच अशक्य होता. पण इथेही समाजातील अनेक हात पुढे आले.
पिंपळगाव बसवंत नगरपालिकेचे कर्मचारी राकेश देशमुख, संतोष डेरे आणि संपूर्ण टीमने जन्मदाखला अर्ज प्रक्रिया प्राधान्याने हाताळली. मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश लचके (लासलगाव) आणि संतोष गिरी (निफाड) यांनीही महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. शिक्षण विभागातून गटशिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी मुलींची शैक्षणिक पात्रता तपासली. सर्वांत महत्त्वाची जबाबदारी होती कायदेशीर वय पडताळणीची.
निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि त्यांच्या टीमने ही प्रक्रिया दक्षतेने पूर्ण केली आणि अखेर संविधानदिनी या दोन्ही मुलींना त्यांच्या आयुष्यातील पहिला अधिकृत दस्तऐवज ‘जन्मदाखला‘ प्राप्त झाला. रेणुका संतोष पवार आणि लक्ष्मी संतोष पवार, अशी त्यांची नवी ओळख अधिकृतपणे नोंदली गेली. एकीचा इयत्ता चौथीत, तर दुसरीचा तिसरीत प्रवेश निश्चित होताच त्यांच्या
शिक्षणाच्या प्रवासाला नवा उजाळा मिळाला.
आज या दोन मुलींना भीक मागण्याच्या असुरक्षित जगातून बाहेर येऊन सुरक्षित छत, मायेची साथ आणि सन्मानाने शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. पत्रकार, पोलीस यंत्रणा, आश्रम, नगरपालिका, शिक्षण विभाग आणि तहसील प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून दोन निराधार जीवांच्या भविष्यात आशेचा दीप पेटला आहे. धुळीत खेेळणार्या या दोन कळ्या आज नव्या भविष्याच्या बागेत
फुलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत माणुसकी अजून जिवंत असल्याचा हा हृदयस्पर्शी पुरावा!