वारकर्‍यांच्या सेवेसाठी छावाचा अनोखा उपक्रम

चार पाण्याचे टँकर आणि डॉक्टरांसह रुग्णवाहिका

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी वारी दिंडी सोहळ्यास यंदा छावा क्रांतिवीर सेना संघटनेने आपला सामर्थ्यशाली सामाजिक सहभाग नोंदवून एक प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघटनेच्या माध्यमातून दिली जात आहे आणि ती अशीच अखंडपणे येणार्‍या अनेक वर्षांपर्यंत सुरू राहील, असे छावाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले. वारी म्हणजे श्रद्धा, शिस्त आणि समर्पणाचा प्रवास. या दिंडीमध्ये हजारो भाविक पायी चालत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी प्रदीर्घ यात्रा करतात. या यात्रेत पिण्याचे पाणी आणि आरोग्यसेवा ही सर्वांत महत्त्वाची गरज असते आणि ही गरज ओळखून छावा क्रांतिवीर सेनेने पुढाकार घेतला. संघटनेने या वारीसाठी चार पाण्याचे टँकर तसेच डॉक्टर व प्रशिक्षित नर्सेससह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा केवळ यंदाच नव्हे, तर मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या उपक्रमामागे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश संघटक नितीन सातपुते यांचा द्रष्टेपणा आणि सेवाभाव दडलेला आहे. हा उपक्रम दरवर्षी अधिक व्याप्तीत आणि प्रभावीपणे राबवण्याचा आमचा निर्धार आहे.
या उपक्रमाचे गणेशवाडी, पंचवटी येथून वारकर्‍यांच्या हस्ते नारळ फोडून प्रस्थान झाले. यावेळी दिंडीसह निघालेल्या हजारो भाविक भक्तांनी छावा सेनेच्या या सेवांचा लाभ घेत मनापासून आभार मानले. यावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील, आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीताताई सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र युवक संपर्कप्रमुख दिनेश जाधव, प्रदेश संघटक नितीन सातपुते, किरण बोरसे, रोहन सपकाळ, अविनाश तांदळे, रुपेश मोरे, डॉ. संदीप वाकचौरे, निकिता अहिरे, मुस्कान रावत, हभप मधुकर अहिरे, निर्मला अहिरे, सुमन दातीर, संतू भवर, भाऊ देवकर, निर्मला बोरसे, राजाराम धोंगडे आणि इतर पदाधिकारी व शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *