आठवणीतील शालेय जीवनातील गाव

ऐंशीच्या दशकात वडिलांची बदली अकोले, जिल्हा अहमदनगर येथे होती. आता इतकी वर्षे जाऊनही हे तालुक्याचे गाव आठवणीत आहे. तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो व मॉडर्न हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. हळूहळू गावाची ओळख होत होती. नाईकवाडी गल्लीत आमचे भाड्याचे घर होते. समोरच श्रीकृष्ण ऑइल मिल होती. तिथे फुलचंद भळगट यांची ओळख झाली. या मिलमध्ये शेंगदाणा तेल काढले जाई. त्यामुळे आम्हाला अगदी ताजे तेल मिळत असे.
बसस्टॅण्ड परिसरात अनेक दुकाने होती. त्यातील काही आठवतात सुधाकर बुक डेपो, रासने यांचे जनरल स्टोअर्स, कोळपकर यांचे भांड्याचे दुकान, एक छोटे हॉटेल ज्यात प्रसिद्ध बटाटेवडा मिळत असे. त्यावेळी तीस पैशात बटाटेवडा, चटणी खाल्ल्याचे आठवते. गुजरी नावाची रोज भाजीपाला मिळण्याची मंडई होती.गावाबाहेर आठवडे बाजार भरत असे. गावात अनेक प्रकारची दुकाने होती.
मॉडर्न व अगस्ती हायस्कूल होते. कॉलेज होते. मुख्य म्हणजे प्रवरा नदी! बारमाही वाहणारी नदी. अनेक वेळा मित्रांबरोबर संध्याकाळी नदीकाठी फिरणे होई. त्यावेळी नदीकाठी भेळेच्या गाड्या वगैरे प्रकार नव्हते. अगस्ती आश्रम, खंडोबा डोंगर, श्रीसिद्धेश्वर मंदिर, तसेच गावात अनेक मंदिरे होती. मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंतराव देशपांडे सर हे व्यक्तिमत्त्व शाळेत व गावातही अनेक उपक्रम करणारे म्हणून प्रसिद्ध होते.
त्यावेळी एकंदर वातावरण शांततामय असे. सांस्कृतिक कार्यक्रम होत, व्याख्याने, भाषणे होत. एक चित्रपटगृह होते. त्यात अल्पदरात चित्रपट पाहण्यास मिळत. अकोल्यात पाऊस भरपूर पडत. अनेकदा नदीला पूर येत असे व पुलावर पाणी आले की वाहतूक बंद पडत असे. आजूबाजूला निसर्गमय वातावरण होते. त्यावेळी वृत्तपत्रे व रेडिओ ही साधने होती. त्यावेळी वातावरणात वादविवाद, मतभेद वगैरे प्रकार कमी होते. शाळकरी वयात जे जाणवले ते लिहिले. कदाचित काही महत्त्वाची ठिकाणे, व्यक्तिमत्त्व राहिली असतील. त्यावेळी विद्यार्थी म्हणून जे अनुभवले ते लिहिले.
– प्रफुल्लचंद्र काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *