महागाईमुळे शेती न परवडणारी

ग्रामीण भागात ट्रॅक्टरने घेतली बैलजोडीची जागा

दिंडोरी ः प्रतिनिधी
ग्रामीण भागात शेतीची अवस्था परवडणारी राहिली नसून, शेतीसाठी मोठ्या भांडवलाची गरज आहे. त्यामुळे शेतीखर्च न परवडणारा असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येते. त्यामुळे नोकरीला प्राधान्य आले आहे. त्यामुळे शेती ही तिसर्‍या स्थानी पोहोचली आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीची मशागत करण्यासाठी बहुतेक जण ट्रॅक्टरचा वापर करतात. डिझेलचे दरही सध्या वाढलेलेच आहेत. त्यामुळे पीक घेणे सोडा, मशागत करणेही वरच्यावर कठीण होत चालले आहे.
आधुनिक युगात शेतीव्यवसाय करताना बैलजोडी सांभाळणे कठीण होत आहे. कारण बैलांना चारा विकत घेणे शेतकर्‍यांना परवडेनासे झाले आहे. दुसरीकडे कडबा व पेंढीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उसनवारी करूनच शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देताना दिसताहेत. त्याचवेळी ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यास त्यात अधिकची भर पडते. अशातच शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. यामुळे काही शेतकर्‍यांच्या अंगणात दिसणार्‍या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरसारख्या यंत्राने घेतली आहे. नांगरणी, पेरणी, कोळपणी व इतर शेती मशागतीची कामे पारंपरिक पद्धतीने करू लागले आहेत. शेतात कष्ट करून पिकांना म्हणावा तेवढा बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेती करणे परवडत नाही, असे शेतकरी सांगताहेत. त्यामुळे ट्रॅक्टर यांत्रिक शेतीचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी मोजक्यात शेतकर्‍यांकडे ट्रॅक्टर व इतर यंत्रे होती. पूर्वी त्याचा वापरही मर्यादित केला जायचा, पण आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही शेतकरी यंत्राने शेतीकामे करत आधुनिकतेची कास धरू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *