बिबट्यापासून बचावासाठी ‘एआय’चा होणार वापर

दिंडोरीत पहिला प्रयोग; एआय लोपर्ड् डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टिम

दिंडोरी : प्रतिनिधी 
दिंडोरी तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य हा कळीचा मुद्दा बनला आहे. पाळीव प्राणी किंवा मनुष्यांवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. या घटनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून, बिबट्यापासून बचावाकरिता आता एआयची (कृत्रिम बुद्धिमत्ता) मदत घेतली जात आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वांत प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला. निळवंडी (ता. दिंडोरी) येथील वाघाड कालव्यालगत असलेल्या वाघमारा शिवारात, तर दुसरा वनारवाडी येथील डमाले शिवारात ‘एआय लोपर्ड् डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टिम’चा, जुन्नरनंतर आता नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग सुरू करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बिबट्यापासून होणारे हल्ले व जीवितहानी टाळण्यासाठी मदत होणार आहे.
सिस्टिमची रेंज साठ मीटरच्या आसपास असून, ही किमान शंभरपेक्षा अधिक असावी. कारण इतके अंतर पार करण्यासाठी बिबट्याला काही सेकंद लागतात, माणूस सावध होण्याच्या आत तो किती पण अंतर जाऊ शकतो. थर्माल सेन्सिव्हिटी असावी, म्हणजेच झाडे, भिंत, शेताचे बांध या पलीकडील सेन्स अचूक असावा. लाइटवर असणारी ही सिस्टिम, लाइट गेल्यानंतर किमान दहा तास तरी सुरू राहावी. त्यावरील कॅमेरा एकच असल्याने त्याच्या रेंजमध्ये बिबट्या न आल्यास मशीन काम करण्याची शक्यता मावळते. त्यासाठी कॅमेरा हा 360 डिग्रीमध्ये फिरणारा किंवा त्याला किमान चार कॅमेरे असावे.

काय आहे एआय सिस्टिम

ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे, अशा भागातील नागरिकांना सतर्कता यावी, यासाठी प्रणालीवर आधारित लोखंडी खांबावर एका खोक्यात सॉफ्टवेअरला एक कॅमेरा बसविला आहे. त्याच्या साठ मीटरच्या अंतरात बिबट्यासारखा प्राणी आल्यास तत्काळ 120 डेसिबलच्या आवाजाने सायरन वाजण्यास सुरुवात होते. हा आवाज शांत वातावरणात दोन किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्या भागातील नागरिक सतर्क होऊन संभाव्य धोका कमी होऊ शकतो. या मशीनला तब्बल एक लाखापेक्षा जास्त बिबट्याच्या इमेज देण्यात आल्यामुळे केवळ बिबट्याचा अवयवासमोर आल्यावरच हा सायरन वाजणार आहे.

एआय लोपर्ड् डिटेक्शन वॉर्निर्ंग अलार्म सिस्टिमचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग दिंडोरी तालुक्यातील निळवंडी व वनारवाडी भागात लावण्यात आला असून, याचा फायदा नागरिक व बिबट्या यांच्यातील संघर्ष कमी होण्यासाठी होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अजून मशीन लावले जातील.
– संतोष सोनवणे, वनसंरक्षक, पूर्व विभाग, नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *