चौथ्या घटनेमुळे मनमाड शहरात भीतीचे वातावरण
मनमाड ः प्रतिनिधी
मुंबई, पुणे, नाशिक यांसह मोठ्या शहरांत वाहन जाळण्याच्या घटना वारंवार घडतात. मात्र, याचे लोण मनमाड शहरात पोहोचले असून, इंडियन हायस्कूलजवळ एका घराबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दोन दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पेटून फरार
झाले.
आगीत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या असून, घराच्या दारालादेखील झळ पोहोचली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मनमाड शहरात ही चौथी घटना घडली असून, याआधी अशा तीन घटना घडल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन बाजूला असलेल्या सर्व्हे नंबर 52 इंडियन हायस्कूलजवळील परिसरातील एका घरासमोर असलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्या असून, या आगीत दोन्ही मोटारसायकली भस्मसात झाल्या आहेत.
याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. मनमाड शहरात ही चौथी घटना घडली असून, याआधी आंबेडकर चौक, विवेकानंदनगर तसेच हनुमाननगर या भागात घटना घडल्या आहेत.
आजची ही चौथी घटना आहे. मनमाड शहरातदेखील आता मुंबई, पुण्यातील राजकारणांची झळ लागली असून, शहरात असे गुन्हे घडत आहेत.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा
मनमाड, नांदगाव शहरात ऑर्गनाइझ क्राइमदेखील घडत असून, छोट्या-मोठ्या कारणावरून थेट घातक शस्त्राने वार करण्यात येत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करावे व असे गुन्हे करणार्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना हद्दपार करावे, अशी मागणी शहरातील सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.