नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला शेतातच सडत असल्याने आवक घटल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात आले आहे. आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरांत उच्चांकी वाढ झाली आहे. भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाकघरातून भाज्या गायब झाल्या आहेत. भाज्यांऐवजी डाळ, उसळ यांचा वापर करत जेवणाची थाळी पूर्ण केली जात आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून भाजीपाला सडून जात आहे. परिणामी, भाजीपाल्याचे उत्पन्न कमी होत असलयाने आवकही घटली आहे. पावसामुळे कांदा, कोबी, फ्लॉवर यांसह पालेभाज्यांचे नुकसान होत आहे. पावसामुळे पीक मातीमोल होत असल्याने शेतकर्यांच्या हातातच उत्पन्न येत नसल्याने बाजारपेठेतही कमी प्रमाणात भाजीपाला दाखल होत आहे.
कारले, वांगी, दोडके यांच्या दरात तब्बल किलोमागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. तर भाजीला चव यावी म्हणून टाकल्या जाणार्या कोथिंबिरीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे.
भाजीपाला दर
कांदे – 10
बटाटे – 30
टोमॅटो- 60
कोबी- 40
फ्लॉवर – 60
मिरची- 120
ढोबळी- 120
वांगे- 120
कारले- 120
गिलके- 120
दोडके- 120
लिंबू – 10
कोथिंबीर- 80
जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर स्थिर होते, पावसाचे प्रमाण वाढले तसे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पालेभाज्याची आवक जास्त प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.
संतोष देवरे, भाजीविक्रेता