लासलगाव:समीर पठाण
लासलगाव सह परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील दोन कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड भुईसपाट झाले असून या शेड मध्ये असलेले अंदाजे वीस ते बावीस लाख रुपयांचे कांदे पाण्यात भिजल्याने कांद्याचेही नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला
शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह व जोरदार वाऱ्याच्या वेगाने पाऊस सुरू झाला.या पावसामुळे येथील कांदा व्यापारी अनिल अब्बड यांच्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दोन कांदा शेड वाऱ्याचा वेगा मुळे जमीनदोस्त झाले त्यात बारा लाख रुपये किमतीचे दोन शेड व अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले तसेच दुसरे कांदा व्यापारी भाऊसाहेब लक्ष्मणराव जगताप यांचे जगताप अँड कंपनी यांचे ६ लाख रुपये किमतीचे शेड व अंदाजे ७ लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.