माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती
नाशिक: प्रतिनिधी
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला आज जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी वाचली आहे. शरणपूर भागात खोटे कागदपत्रे सादर करून सदनिका बाल्कवल्या प्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते, या निर्णयामुळे कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती, आज यावर सुनावणी होऊन शिक्षेला स्थगिती देण्यात आली, त्यामुळे कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे,
काय आहे प्रकरण
1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.