मंत्री प्रा. अशोक उईके यांचे मार्ग काढण्याचे आंदोलकांना आश्वासन
पंचवटी : वार्ताहर
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांवरील रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार आश्रमशाळा कर्मचारी यांचा बिर्हाड मोर्चा सोमवार (दि.16) रोजी दुपारी दोन वाजता नाशिकच्या वेशीवर आडगाव ट्रक टर्मिनल येथे दाखल झाला. जोपर्यंत सरकार ठोस आश्वासन देत नाही, आदिवासी विकासमंत्री महोदय येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर हटणार नाही, असा पवित्र या आंदोलकांनी घेतल्याने मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल साडेचार तास रोखून धरली होती. त्यामुळे वाहतुकीचादेखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता.
हा मोर्चा (दि.16)रोजी दुपारी बारा वाजता दहावा मैल ओझर येथून ट्रक टर्मिनल आडगाव येथे दुपारी दीड वाजेच्या दरम्यान दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाला पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी संतप्त होऊन ट्रक टर्मिनल येथेच महामार्गावर ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी घटनास्थळी आपली वाढीव कुमक वाढवून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक त्यांना दाद देण्यास तयार नव्हते. जोपर्यंत आदिवासी विकासमंत्री या ठिकाणी येत नाही आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होते.
दरम्यान राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी येत्या दोन दिवसांत मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच आंदोलकांचे शिष्टमंडळ चर्चा करून निश्चित यातून मार्ग काढू असे आश्वासन यावेळी मंत्री उईके यांनी आंदोलकांना दिले. मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. अर्धतासाच्या चर्चेनंतर देखील आम्ही याच ठिकाणी थांबू, असा पवित्रा या आंदोलकांनी घेत वाहतूक सुरळीत ठेवू, असे आश्वासन दिले.
यावेळी भरपावसात आंदोलकांच्या वतीने ज्ञानेश्वर भागले व रूपाली कहांडळे यांनी, साहेब आम्हाला न्याय द्या, आम्ही दीडशे किलोमीटर पायी चालत आलो आहोत. अन्न नाही, पाणी नाही, चहा नाही भरपावसात आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहोत.आम्हाला न्याय पाहिजे, निर्णय पाहिजे, आश्वासन नको, तुम्ही शिक्षक आहात, त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपण सरकारला वेळ द्यावा आम्ही सर्वजण बसून त्यावर विचार करू, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांसोबत येत्या एक- दोन दिवसांत आपल्या शिष्टमंडळाची बैठक घेतो, असे सांगून मंत्री गिरीश महाजन यांना फोनवर आंदोलनाची कल्पना दिली.
यावेळी मंत्री महाजन यांनी दूरध्वनीद्वारे यावेळी आंदोलकांशी चर्चा केली. बिर्हाड मोर्चामुळे ओझर ते नाशिक दरम्यानची वाहतूक तब्बल चार तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी वाहने रस्त्यात अडकली. धुळे जळगाव, मालेगाव, चांदवड, नांदगाव आदी भागातून येणार्या बसेस, इतर प्रवासी वाहने, मालवाहू वाहने तीन ते चार तास अडकून पडले होते. अनेक वाहन चालकांनी नागरिकांनी ओझर ते नाशिक अक्षरशः पायपीट करत प्रवास केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वाहनचालक, प्रवासी वैतागले होते.
वाहतूक ठप्प झाल्याने कोकणगाव, सुकेणे, चांदोरी, छत्रपती संभाजीनगर मार्गाने नाशिक अशी वाहतूक काही कळवण्यात आली.काही वाहतूक सय्यद पिंपरी- ओझरमार्गे वळवण्यात आली.