येवल्यात छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे शेतकर्यांचे आंदोलन
येवला : प्रतिनिधी
कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने कांद्याला योग्य भाव देऊन दिलासा द्यावा, या मागणीसाठी येवला शहरात छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
येवला शहरातील येवला-मनमाड राज्य महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेत, 2000 रुपयांपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. ‘कांदा पिकवण्यासाठी प्रतिकिलो 25 रुपये खर्च येत असताना, बाजारात मात्र उत्पादन खर्चही निघत नाही,’ अशी व्यथा आंदोलकांनी मांडली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांना सहकार्य करावे, कमी भावात विकलेल्या कांद्याला 1000 रुपये क्विंटल सानुग्रह अनुदान मिळावे. मक्याच्या आधारभूत किमतीतील फरकाची 50 टक्के रक्कम तत्काळ मिळावी, 30 जून 2026 पर्यंतचे सर्व शेती कर्ज सरसकट माफ करून नवीन पीककर्ज वाटप करावे, कांदा निर्यात पूर्णपणे खुली करून व्यापार्यांना प्रोत्साहन द्यावे आदी मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी रास्ता रोको आंदोलनात करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी इशारा दिला आहे की, जर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र लढा उभारला जाईल. आंदोलनाला शेतकरी तसेच छावा क्रांतिवीर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘Block the road’ for fair price for onions