जिल्ह्यातील उमेदवारांचे निकालापूर्वी पर्

नाशिक : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीचा निकाल तब्बल अठरा ते वीस दिवस लांबल्यामुळे निवडणुकीतून उसंत मिळालेले उमेदवार आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. काही जण आकडेमोड करण्यात गुंतले असताना, काहींनी सहकुटुंब देवदर्शन व पर्यटनावर भर दिला आहे.
जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. ओझर, चांदवड, पिंपळगाव बसवंत, सटाणा, सिन्नर, येवला, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, भगूर, नांदगाव, मनमाड या ठिकाणच्या नगरपरिषद निवडणुका झाल्या. यामध्ये महायुतीतच बहुतांश ठिकाणी सामना रंगला. नांदगाव व मनमाड येथे शिवसेना शिंदे गटाबरोबर भाजपाने युती केली. विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट होता. येवल्यातही महायुतीमध्येच समोरासमोर सामना रंगला होता. भगूरचीही परिस्थिती काहीशी अशीच होती. त्र्यंबकेश्वरलादेखील भाजपाविरोधात शिंदे गटाने रणशिंग फुंकले होते.
महाविकास आघाडी यात फारशी चमक दाखवू शकली नाही. काँग्रेसची अवस्था तर जिल्ह्यात अतिशय बिकट झाली आहे. मनसेने तर यापूर्वीच निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. जिल्ह्यात अतिशय त्वेषाने लढविल्या गेलेल्या निवडणुकांचा निकाल नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे लांबल्यामुळे उमेदवारांची घोर निराशा झाली. निकालाबाबतची उत्सुकता उमेदवारांबरोबरच सामान्य नागरिक व राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आहे. येत्या 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याने राहिलेले दिवस मोजण्याची वेळ सर्वांवर आली आहे. राहिलेल्या दिवसांच्या प्रतीक्षेत एक-एक दिवस जात असताना काही उमेदवारांनी निवडणुकीनंतर सहकुटुंब देवदर्शनाला, तर काही उमेदवार पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धबडग्यात कुटुंबासाठी वेळ देता न आलेली मंडळी आता निकाल लांबल्याची संधी साधत सहकुटुंब पर्यटन आणि देवदर्शनाचा आनंद घेत आहेत.
निवडणुकीचा निकाल 21 तारखेला जाहीर झाल्यानंतर पुन्हा वेळ मिळेलच, याची शाश्वती नसल्यामुळे सध्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यावर उमेदवार भर देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *