अमित शहांच्या उपस्थितीत राज्यसभेचा अर्ज दाखल
नवी दिल्ली :
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून, अनपेक्षित नावे समोर येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार सोडून दिल्लीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री आता राज्यसभा खासदार होणार आहेत. याबाबत त्यांनी काल सकाळी सोशल मीडिया पोस्ट करून माहिती दिली होती. यानंतर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नामांकन अर्ज दाखल केला आहे.
नितीश कुमार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून संख्याबळाच्या आधारावर बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. तर नितीश यांच्या जेडीयूकडूनदेखील मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे बिहारमध्ये कुणाचा मुख्यमंत्री होणार, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर नितीश कुमार यांचे पुत्र बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार असल्याचे समजताच जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. हा निर्णय नितीश कुमारांचा नाही, ही गद्दारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे. तर जेडीयू नेते सतीश कुमार सुमन म्हणाले की, अमित शहा यांनी 15 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. एमएलसी पदासाठी करार झाला आहे. नितीश कुमार यांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. लल्लन सिंह, संजय झा आणि विजय चौधरी यांनी हे सर्व केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Chief Minister Nitish Kumar will become an MP