शासनाच्या उदासीन धोरणामुळे समित्यांचे अस्तित्व कागदावरच
निफाड : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावांमध्ये नेमलेल्या तंटामुक्त गाव समित्या पूर्वी जोमाने काम करीत होत्या. अलीकडे गावातील तंट्यांकडे या समित्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. शासनाने या समित्यांना अधिकार फक्त नावापुरते ठेवल्याने गावागावांतील तंटामुक्त गाव समितीचे अस्तित्वच गायब झाले आहे.
पोलिस ठाण्यात सतत गावातील किरकोळ वादाच्या तक्रारी आता थेट पोलिस ठाण्यात जात असल्याने तंटामुक्त गाव समिती केवळ कागदावरच उरली आहे.
शेताच्या बांधावरून, सांडपाण्यावरून, घराच्या बांधकामावरून, द्राक्षबागेचे अँगल करण्यावरून तसेच अनेक कारणांवरून नेहमीच वाद होतात. वाद तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य सामोपचाराने गावातल्या गावातच मिटवत होते. निधी नसल्यामुळे समितीतील अध्यक्ष व सदस्यांनी आता याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील किरकोळ वाद-तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. यामुळे गावागावांतील तंटे कमी झाले होते. गावात नेमलेल्या समित्याही जोमाने काम करीत होत्या. भावकीत उद्भवणारे तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यावर भर दिला जात होता. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्याअगोदरच मिटत होते. गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्त समित्या स्थापन करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहिमेला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला होता. तंटामुक्त समिती गरजेची असून, या समितीला पुन्हा उभारी देणे गरजेचे आहे.
राज्यात गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. भावकीत उद्भवणारे तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीचे काम चांगले होते. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्याअगोदरच मिटले जायचे. त्यातून गावपातळीवर एकोपा निर्माण होत होता. त्यामुळे मरगळ आलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पुन्हा जोमाने राबवण्याची गरज आहे.
– योगेश बोरगुडे, नैताळे, ता. निफाड