लासलगाव : प्रतिनिधी
पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करत असताना शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी धारणगाव वीर येथील दोघांविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धारणगाव वीर येथील तलाठी गणेश शंकर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ते व त्यांचे सहकारी ग्रामसेवक अतुल आढाव व कृषी सहाय्यक प्रदिप नवले हे धारणगाव खडक येथील शेतकरी सुदाम महादु जाधव यांच्या शेतात पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करत असताना त्याठिकाणी श्रीकांत सोमनाथ सोनवणे व गणेश खंडू सोनवणे दोन्ही रा धारणगाव वीर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांचेशी पंचनामा करण्यावरुन उध्दटपणे बोलुन वाद घातला त्यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना समजावुन पुन्हा ते त्यांचे पंचनामा करण्याचे काम करु लागले.
या वेळी श्रीकांत सोनवणे व गणेश सोनवणे या दोघांना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा राग आल्याने ते फिर्यादी यांचेशी झटापट करु लागल्यावर साक्षीदार अतुल आढाव हे सोडवा सोडव करण्यासाठी आले असता त्यांचे हातातील कागदपत्र फेकुन देत शिवीगाळ करत तुम्हाला गांवामध्ये नोकरी करणे आवघड करुन टाकु असा दम दिला व त्याठिकाणाहुन निघुन गेले.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो ऊ नि अजिनाथ कोठाळे व पोलिस कर्मचारी करत आहे