निफाडच्या 135 गावांत पीक नुकसानीचे पंचनामे

अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे होणार पंचनामे

निफाड ः तालुका प्रतिनिधी
तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हातात आलेल्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून ती सडू लागली आहे. साहजिकच तालुक्यातील 135 गावांतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी नम्रता भामरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिले.
संपूर्ण जिल्ह्यात पाऊस कोसळल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने दहा वर्षांत झाला नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली. प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली. सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करीत त्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारपासून 33 टक्क्यांवरील ज्या पिकांचे नुकसान झाले, अशा पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहे.
शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावे. पंचनाम्यातून कुणी राहू नये, यासाठी पंचनामे करणारे कामगार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या त्या परिसरातील मंडळाधिकार्‍यावर सोपविण्यात आली आहे.

सर्व नुकसानीचे होणार पंचनामे

निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे प्रगतिपथावर सुरू करण्यात आले आहे. पूर्वी पीक नुकसानीचे निकष 59 टक्केच्या पुढे होते.त्यात शिथिलता आणून ते 33 टक्के केले आहेत. मात्र द्राक्ष बागेच्या बाबतीत ज्या बागांची छाटणी झाली आहे, त्यांना कोंब, घड आले आहे, असे नुकसान झाले असेल तर त्याचे पंचनामे करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी स्पष्ट केले.

आम्हाला प्रत्यक्ष शेतात जाऊन व पिक नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. 33 टक्क्यांवर नुकसान झालेले मका, सोयाबीन, टोमॅटो, द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचे पंचनामे करीत आहे. दोन तीन दिवसांत पीक पंचनाम्याची ही प्रकिया पूर्ण करून वरिष्ठांना अहवाल द्यावयाचा आहे.
– वंदना अघाव, कृषी सहाय्यिका, निफाड.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *