वन विभागाकडे शेतकर्यांची बंदोबस्ताची मागणी
देवळा ः प्रतिनिधी
शेरी (ता. देवळा) येथे पेरणी केलेल्या मका बियाण्याची रानडुकरांकडून नासधूस होत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शेरीचे उपसरपंच नंदू जाधव, आनंदा पवार, गंगाधर पवार यांनी देवळा तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधारेनंतर खर्डे परिसरात बहुतांश शेतकर्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणीला सुरुवात केली. यात मक्याची पेरणी जास्त प्रमाणात दिसत आहे. शेरी येथील शेतकरी आनंदा पवार यांनीही मक्याची पेरणी केली. शेतात रानडुकरांकडून नासाडी करण्यात आल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. परिसरात रानडुकरांचा मुक्त संचार वाढला असून, पेरणी केलेले बियाणे शेतातून उकरून काढत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खर्डेसह शेरी, वार्शी, कनकापूर, हनुमंतपाडा, मुलूखवाडी येथील शेतकर्यांनी केली आहे.
पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे मक्याचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली. याबरोबर रासायनिक खतदेखील वापरले आहे. बियाणे शेतात उगवले कीनाही ते पाहण्यासाठी गेल्यावर या ठिकाणी पेरलेले बियाणे रानडुकरांनी उकरून काढल्याने नुकसान झाले आहे.
– आनंदा पवार, मका उत्पादक शेतकरी, शेरी (ता. देवळा)