मौनव्रत असल्याने माध्यमांना प्रतिक्रिया नाही
पंचवटी : वार्ताहर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी बुधवारी (दि.4) नाशिकमध्ये होते. सकाळी गोदाघाटावर एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर संध्याकाळी त्यांनी विवाह सोहळ्यासदेखील हजेरी लावली. परंतु, मुंडे यांनी मौनव्रत असल्याचे खुणवत कोणत्याही विषयावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. इगतपुरीच्या विपश्यना केंद्रातदेखील शेवटच्या दिवशी संवाद कार्यक्रमात सहभाग न घेता त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेला आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या सहकार्यांना बीड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विरोधकांनी आणलेल्या दबावामुळे मुंडे यांनादेखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुंडे हे माध्यमांपासून जरा अंतर राखून असल्याचेच दिसून आले आहे. दरम्यान, दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ-बहीण कार्यक्रमात दिसून आले. तब्बल 11 वर्षांनी ते एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडेदेखील काही बोलतील, अशी अपेक्षा उपस्थितांना होती. परंतु, यावेळी देखील त्यांनी बोलणे टाळले. दोन दिवसांपूर्वीच इगतपुरीतील विपश्यना केंद्रात मुंडे यांनी दहा दिवस ध्यानधारणा केली. परंतु समारोपालादेखील संवाद न साधता मुंबईची वाट धरली होती.