मानसिक घटस्फोट

मानसिकघटस्फोट

जोडीदारांच एकमेकांशी नाही पटल की,ते एकमेकांचा रीतसर घटस्फोट घेतात. असे कोर्टात होणारे घटस्फोट आपणास ठाऊक आहेत. पण…..मानसिक घटस्फोट!..ऐकायला जर कसतरीच वाटत ना! पण काही दिवसापूर्वी अशीच एक केस आली.एक पुरुष…ज्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली. पण दोघांचाही स्वभाव, लग्नाआधीच वातावरण,दोघांवर झालेले भिन्न भिन्न संस्कार यामुळे दोघांच कधी पटलंच नाही. त्यात त्याचा पुरुषी अहंकार! ( जो त्याने स्वतः कबूल केला…) यामुळे मनाच एकरुप होणं त्याच्यात कधी झालंच नाही….त्याच्या तोंडून शब्द आला की,आमचा तसा मानसिक घटस्फोट केव्हाच झाला आहे. पण लोक काय म्हणतील? घरचे लोक,नातेवाईक यांचा विचार करुन आम्ही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही. यावर तुमच मत काय? तस मी त्यांच्याशी मला जे वाटत ते सांगितलं. पण राहून राहून …”मानसिक घटस्फोट”…. हा विषय डोक्यातून जाईना. कारण लग्न हा एक लकी ड्रॉ आहे. जोडीदार चांगला….चांगला म्हणजे वेल सेटेड,सुंदर असा नव्हे….चांगला म्हणजे समजून घेणारा,काळजी घेणारा,आणि मुख्य म्हणजे तुम्हाला फक्त माणूस मानणारा भेटेलच असं नाही ना. आणि खरंच सर्व्हे केला तर जाणवेल की,आज कित्येक कपल हे मानसिक घटस्फोट घेऊन एकमेकांसोबत आयुष्य ढकलत आहेत. का? कशासाठी? याची ज्याची त्याची उत्तरे आहेत. पण यात सुखी कोणीच नाही. हे एक सामाजिक वास्तव आहे….
पण वर्षानुवर्षे होत राहणारे असे मानसिक घटस्फोट दोघांनाही आनंदी जीवन देऊ शकत नाहीत. जर खरच तडजोड करायचीच असेल तर दोघांनीही काही गोष्टी समजून घेऊन स्वतः मध्ये बदल घडवून आणावे लागतात. तसं नाही जमलं तर मात्र आयुष्यभर अशा नात्याच ओझं वाहत आयुष्य ढकलावं लागतं.इथे दोष कोणाच हे महत्वाचं नसतंच. कारण दोघेही एकमेकांना दोष देत राहतात. कारण मुळात कोणत्याही नात्यात आधी एकमेकांचा स्वीकार व्हावा लागतो. तोच झाला नसेल तर गुंता वाढत जातो.खूपदा दोघांपैकी एक असा स्वीकार करुन तडजोड करत राहतो. पण दुसरा त्याला गृहीत दरून मनमानी करत राहतो. अशा वेळी तडजोड करणाऱ्याचीही सहनशीलता हळूहळू संपते. मग अशी नाती फक्त कर्तव्य म्हणून ढकलली जातात. पण माणसांना शेवटपर्यंत कळतंच नाही की,आयुष्य क्षणभंगुर आहे. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन,एकमेकांना स्पेस देऊन छान जगाव ते. मला तर वाटतं की,लोक काय म्हणतील, यात न अडकता, अति झाल तर दोघांनीही एकमेकांशी बोलून असह्य होणार ओझं उतरवून मोकळं व्हावं. सीने कलाकार, किंवा काही श्रीमंत व्यक्ती, खूप विचारी व्यक्ती अगदी सहजच वेगळी होतात. कारण त्यांना ठाऊक असत की,ताणून तोडण्यापेक्षा समजुतीने वेगळ व्हावं. कारण इथे प्रत्येकाला आनंदी जीवन जगण्याचा हक्क आहे. पण मध्यमवर्गीय समाजात आर्थिक स्थिती मध्यम असणं,बाई पैशासाठी स्वावलंबी नसणं,आणि स्वावलंबी असली तरीही मुलांसाठी तर कधी घरच्यांसाठी असे निर्णय घेतले जात नाहीत. तर कधी कधी वर्षानुवर्षे मांडलेला संसार क्षणात मोडण्याच धैर्य नसणं यामुळे देखील असे निर्णय घेतले जात नाहीत. आणि त्यामुळेच मानसिक घटस्फोट वाढताना दिसतात. पण खरंच अशी नाती केवळ मन:स्ताप देत राहतात. कधी कधी अति झाले तर यातूनच नैराश्य, इतर मानसिक आजार वाढत जातात. त्यापेक्षा दोघांचाही योग्य असेल असा मार्ग निवडावा. तोही सामोपचाराने…… पण खरंच सामोपचार दोघांकडे असतो का?

लेखिका, समुपदेशक
सुधा पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *