हुंडा की संस्कारांची शिदोरी?

आपलंच खाऊन आपल्याच जीवावर मोठे होणारे एक दिवस आपल्यालाच संपवायला मागे-पुढे बघत नाहीत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा जे तुमच्या कष्टाचं आहे ते कधीही कोणाच्या ओंजळीत फुकट टाकू नका. त्याची लायकी आधी नक्कीच तपासा, मग तो पैसा असो वा पोटचा गोळा.

जग झटपट श्रीमंत व्हायला निघाले आहे. कोणाच्या श्रीमंतीची शिडी मुळीच बनू नका. हरामाने मिळविलेला पैसा एक दिवस संपून जातो आणि कष्टाचे मात्र शेवटपर्यंत पुरते.
नुकतीच घडलेली हुंडाबळीची घटना. हगवणे कुटुंबीयांच्या सुनेचा, वैष्णवीचा हुंडाबळी. ही घटना कोणत्याही खेड्यातील अथवा अशिक्षित घरातील मुळीच नाही बरं का! तर पुण्यासारख्या शहरातील उच्चभ्रू घराण्यातील. केवळ पैशाच्या हव्यासापोटी जिच्यासोबत कधी प्रेमाच्या शपथा घेतल्या होत्या तिचाच बळी घेताना काहीच कसे वाटले नाही. वैष्णवी हगवणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची केस आहे. समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या अजूनही कौंटुबिक हिंसाचाराच्या बळी होत आहेत. त्यात सुशिक्षित वर्गही मागे नाही. उलट शिकलेली लोकं अशी वागतात तेव्हा अडाणी व्यक्तींकडून काय अपेक्षा करावी़? मुळात मुद्दा गरीब-श्रीमंत हा नाहीच हो. 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी एवढं घेऊनही दोन कोटींची भूक… काय म्हणावं या भुकेला, या गरीब वैचारिकतेला.
खरंतर कोणत्याही घटनेला दोन बाजू असतात. मुळात मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहणे, आत्मनिर्भर होणे खूप गरजेचे आहे. प्रेमविवाह करताना मुले-मुली आई-वडिलांचे ऐकत नाहीत, परंतु त्यापेक्षा आपण निवडलेला जोडीदार हा योग्य आहे का, याचा
स्वत:च विचार करणे खूप आवश्यक आहे.
नुसता जोडीदार योग्य आहे का हे तर बघावेच, परंतु त्या जोडीदाराचे कुटुंब, त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेणे हे तितकेच महत्त्वाचे असते. बर्‍याचदा प्रेम हे नसतेच, ते एक आकर्षण असते आणि युवा पिढी त्यात वाहवत जाते.
विवाहापूर्वी दोघांचेही समुपदेशन करून घेतल्यास एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी सहज समजू शकतात. समुपदेशनाच्या माध्यमातून एक सून किंवा जावई म्हणून, पती- पत्नी म्हणून आपल्या काय जबाबदार्‍या आहेत, याची जाणीव करून दिली जाते. पती-पत्नी हे भविष्यातील होणारे आई-बाबा असतात. एक पालक म्हणूनही आपल्या जबाबदार्‍या असू शकतात, याचीही जाणीव त्यातून करून दिली जाते. मुळात विवाह म्हणजे वि + वाह = विवाह. म्हणजेच दुसर्‍याला वाहून घेणे. समोरच्याच्या सुखासाठी स्वत:ला वाहून घेणे. आता हे दोघांनाही लागू होते बरं का! आपण ज्याच्यासोबत राहत आहोत तो किंवा ती आपली आयुष्यभराची साथीदार आहे. ती म्हणजे, फक्त पैसे कमावणारी मशिन नव्हे की, आपल्या घरात काम करणारी एखादी गुलामही नव्हे, याची जाणीव अंतर्मनापासून झाली पाहिजे. असे झाल्यास चुकूनही समोच्याला इजा व्हावी, दुखवावे, अशी भावना मनात उत्पन्न होऊ शकत नाही.
महिलांना पूर्वापारपासूनच समाजात दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. ती कमवायला लागली तरी तिची चूल आणि मूल सुटले नाही. समाजात असणारी पुरुषप्रधान संस्कृती, पितृसत्ताक पद्धती या सर्व परंपरांमुळे समाजात महिला-पुरुष हा भेद कायमच राहील. त्यासाठी समानता येणे फार आवश्यक आहे.
महिलांनीही त्यांना होणारा त्रास मोकळेपणाने सांगितला पाहिजे, अशा गोष्टी वेळीच लक्षात आल्यास वैष्णवीसारख्या निष्पाप महिलेचा बळी जाण्यापासून नक्कीच वाचू शकला असता. मुलीच्या घरच्यांनीही समाज काय म्हणेल केवळ या ध्यासापोटी अत्याचार सहन करणार्‍या महिलांना पाठिंबा दिलेला नाही. आपली लहानशी गोंडस मुलगी जिला आपण काऊ-चिऊचा घास करून भरवतो, मोठी करतो, ती जेव्हा तिच्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल माहेरी सांगते तेव्हा हेच आईबाप का त्या चार लोकांचा विचार करत बसतात, जे तुमच्या मुलीचा बळी गेल्यावर तुमच्या दु:खातसुद्धा सहभागी व्हायला येत नाहीत. म्हणून वेळीच जागे व्हा.
मुलगा-मुलगी एकसमान माना. जसे मुलगा त्याची पत्नी सोडून मानाने समाजात वावरू शकतो, दुसर्‍या लग्नासाठी तयार होऊ शकतो, तर हा पर्याय मुलीला का असू शकत नाही. आपल्या मुलींना सक्षम बनवा, चांगल्या वाईटाची शिकवण द्या आणि पाटीभर हुंडा देण्यापेक्षा तिला संस्कारांची शिदोरी द्या, ती तिला आयुष्यभर कामी येईल. आयुष्याचे गणित कितीही अवघड असले, तरी ते एका छोट्याशा सूत्राने सुटू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *