कृषिपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा

येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकनतर्फे वीज कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा

येवला ः प्रतिनिधी
कृषिपंपांसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा तत्काळ रद्द करून तो दिवसा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात वीज वितरण कंपनी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. येवला शहरातील विंचूर रोड चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अ‍ॅड. शिंदे, पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर येथून मोर्चाला प्रारंभ झाला. दरम्यान, सदर मोर्चाला शिवसेना (शिंदे गट), शिवसेना(उबाठा), प्रहार संघटना छावा क्रांतिवीर संघटनांनी पाठिंबा दिला. शेतकरी, शेतमजूर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून इंद्रनील कॉर्नर, शनिपटागंण रोडने महावितरण कंपनीकडे आणण्यात आला. तिथे सभेत रूपांतर झाले. अ‍ॅड. शिंदे, स्वारिपचे पगारे, ज्येष्ठ नेते महेंद्र काले, शिवसेनेचे शिंदे गटाचे पांडुरंग शेळके यांची भाषणे झाली. वीज वितरण कंपनीने कृषिपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा तत्काळ रद्द करून दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. वीज वितरण कंपनी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. शिंदे, पगारे, काले यांनी बोलताना दिला. दरम्यान, मोर्चाकर्‍यांतर्फे महावितरण कंपनीचे उपअभियंता आर. एम. पाटील, उपअभियंता मिलिंद जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात वीज कंपनीकडून भारनियमनाच्या नावाखाली कृषिपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा केला जातो. अनेक शेतकरी बांधवांनी सौरऊर्जा कृषिपंप बसवल्यामुळे वीज वितरण कमी झाले आहे. असे असतानादेखील भारनियमन कसे? असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो. नाइलाजास्तव पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर जर बिबट्याने हल्ला केल्यास जबाबदार कोण राहील? शेतकर्‍याचा जीव गेल्यानंतर शासन मदत जाहीर करते, मदत देण्याऐवजी दिवसाची कृषिपंपांसाठी वीज द्यावी, अशी मागणी आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिंदे, शाहू शिंदे, स्वारिपचे जिल्हाध्यक्ष पगारे, पांडुरंग शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले, महेश काळे, युवा नेते गोरख पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार, सुभाष निकम, प्रहारचे हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, योगेश सोनवणे, अमोल तळेकर, शेतकरी नेते श्रावण देवरे पाटील, छावाचे प्रफुल्ल गायकवाड, शिवसेना युवा नेते डॉ. महेश जोशी, स्वारिपचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे, उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, संतोष आहिरे, बाळू पठारे, अक्षय तांदळे, सचिन कड, रामदास पवार, सुरेश कदम, गणेश झाल्टे, विजय पगारे, समाधान पगारे, बाळासाहेब सोनवणे, समाधान गुंजाळ, दादासाहेब मोरे, सुरेश खळे, वसंत घोडेराव, प्रशांत वाघ, अजीजभाई शेख, अमोल झाल्टे, प्रशांत जाधव, गौतम पगारे, विनायक गायकवाड, दौलत गायकवाड, दिलीप गायकवाड, नलिनी पाटील, राणी शिंदे, ज्योती पगार, सुनंदा काळे, अलका घोडेराव, उषाबाई पगारे, मनीषा पगारे, पुष्पा आहिरे, नीता आहिरे, शोभाबाई घोडेराव, शाबिना शेख, पार्वतीबाई पगारे, रूपा मावस आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Electricity should be provided for agricultural pumps during the day instead of at night.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *