त्रिसूत्री आत्मसात करा, यश मिळणारच

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे प्रतिपादन

 

नाशिक : प्रतिनिधी

 

भविष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी स्मार्ट हार्डवर्क, प्रामाणिकपणा आणि जिद्द या त्रिसूत्री आत्मसात केल्यास यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. मग ते क्षेत्र कोणतेही असो, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञापीठात असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स नाशिकतर्फे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विशेष चर्चासत्राचे (विद्यार्थी समिट) आयोजन करण्यात आले असता, अध्यक्षस्थानावरून ना. कराड बोलत होते. खासदार प्रीतम मुंडे, ऍड. अरविंद आव्हाड, प्रधान सचिव प्रवीण दराडे, आ. किशोर दराडे, एमआयटीचे राहुल कराड, जयंत जायभावे, भारत गिते, धुळे महापालिकेचे महापौर नाना कर्पे, गिरीश पालवे, उदय घुगे, प्रशांत आव्हाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. कराड म्हणाले, आज हा कार्यक्रम नाशिकमध्ये होत आहे. यापुढे हा कार्यक्रम नाशिकमध्येच नव्हे तर राज्यभर व्हावा. दिल्लीत विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी चांगली व्यवस्था असायला हवी. जेणेकरून केंद्रात आपल्या समाजातील अधिकार्‍यांचा टक्का वाढला पाहिजे. याच धर्तीवर संभाजीनगर, नाशिक आदींसह राज्यातील विविध भागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे ना. कराड म्हणाले.

ज्या समाजातून आपण मोठे झालो आहोत, त्याचे आपण देणे लागत असल्याने त्याकरिता आपण काहीतरी करायला हवे. तुमचे पाय जमिनीवरच असायला हवे. जेव्हा आपल्याला फायनान्स मंत्री करण्यात आले. त्यावेळी फायनान्सचा अगदी सुरुवातीपासून अभ्यास करून माहिती जाणून घेतली. म्हणूनच आता सीए किंवा कोणीही फायनान्स क्षेत्रातील व्यक्ती असेल त्यांच्यासमवेत या विषयावर बोलू शकत असल्याचे म्हटले. ज्याप्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, भविष्यात ते सुरूच ठेवावे. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन ना. कराड यांनी दिले.

खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान आणि स्वाभिमान असायला हवा. मात्र आपल्या कृतीमुळे दुसर्‍या जातीचा अपमान होईल असे कधीही होता कामा नये. जाती-पातीच्या भिंती उभ्या राहणार नाही आणि यावरून वादविवादही होणार नाही याकरिता आपल्या जातीबरोबरच दुसर्‍या जातीचाही आपण सन्मान करायला हवा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कधी जात म्हणून राजकारण केले नाही, तर सर्व जाती-जमातीच्या लोकांना सोबत घेउन काम केले. शेतकर्‍यांनी शेती विकली तरी चालेल, पण मुलांचे शिक्षण करावे, असेही त्यांनी नमूद केले.

शैक्षणिक, राजकीय, नोकरी आरक्षण घेत असताना आपण आपल्या जातीसाठी काय करतोय हे पाहायला हवे. मेहनतीची तयारी ठेवा व प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन खा. मुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. एमआयटीचे राहुल कराड यांनी आपल्या वागण्यात गर्व असेल तर त्याचा फटका बसत असल्याचे म्हटले.

प्रधान सचिव प्रवीण दराडे म्हणाले, मी शेतकरी कुटुंबातील असताना केवळ मेरिटमुळे आयएएस होऊ शकलो. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला शेती विकावी लागली तरी चालेल नंतर याच शिक्षणाच्या जोरावर कितीही पटीने शेती तुम्ही घेऊ शकतात. म्हणूनच वंजारी समाजातील प्रत्येकाला शिक्षण मिळायला पाहिजे, असे मत दराडे यांनी व्यक्त केले. यावेळी चर्चासत्रात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महापौरपदानंतर मंत्रिपदाचा प्रवास

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे संभाजीनगरचा महापौर झालो. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आपले राजकारण संपले असे वाटले. आणि आपण आता बालरोगतज्ज्ञ म्हणून पुन्हा काम सुरू करावे असे वाटले. पण मध्येच देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आपला बायोडाटा मागितला. हा बायोडाटा का मागितला, याबाबत आपल्यालाच काहीच माहिती नव्हते. दरम्यान, फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे बायोडाटा पाठविल्याचे समजले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी खासदार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईला बोलावले अन् राज्यसभा खासदार झालो. पुढे मंत्री मंडळ विस्तार चर्चा झाली. नंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः अर्धा तास मार्गदर्शन केले. त्यावेळी मला वाटले की, डॉक्टर असल्यामुळे आरोग्यमंत्री केले जाईल. परंतु तसे न करता आपल्याला अर्थ राज्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे ना. कराड यांनी सांगितले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *