हक्काच्या बाजारपेठेची अपेक्षा, झाडांमध्ये घट, संवर्धन होणे गरजेचे
अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
आदिवासी बांधवांचे जीवनमान निसर्गाशी एकरूप असून, जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणार्या गावरान करवंदे विक्रीतून इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडीच्या आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळत आहे.
डोंगरची काळी मैना म्हणून प्रसिद्ध असलेले करवंदे इगतपुरीतील दुर्गम आणि कुरुंगवाडीच्या आदिवासी भागातील डोंगरदर्यांत बहरून आल्याने आता बाजारात दाखल झाली आहेत. आदिवासी बांधवांना स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायातून त्यांची रोजीरोटी भागत असते. डोंगरची काळी मैना आरोग्यदायी असून, दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. आम्ही परंपरागत हा व्यवसाय करतो. दिवसाकाठी दोन तीनशे रुपये मिळतात. दिवसेंदिवस करवंदांची झाडे कमी होत आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे महिलांनी सांगितले.
गेल्या 20 वर्षांच्या तुलनेत करवंदांची झाडे घटली आहेत. या भागातील डोंगरची काळी मैना सध्या सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आंबट-तुरट चवीचा हा रानमेवा चाखण्यासाठी करवंदांच्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. पूर्वी वाट्यावर मिळणारा हा रानमेवा आता दीडशे ते दोनशे रुपये किलोने विकला जात आहे. पांढर्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंद बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो.
आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात. आदिवासी बेरोजगार तरुण व महिलांना करवंदांपासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मीराबाई गांगड, गोदाबाई निरगुडे, कविता खडके, हौसाबाई सावंत, किसनाबाई मेंगाळ, शांताबाई सावंत, सुनीता सावंत, मीनाबाई सावंत, पदू गांगड, बाबू सावंत, एकनाथ मेंगाळ, सखाराम सावंत, सोमा गांगड, जयराम निरगुडे, संतू सावंत, सोमनाथ खडके, बबन झुगरे आदींनी केली आहे.
करवंदांचे आरोग्यदायी लोणचे
आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वीच करवंदांचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदांपासून चांगल्या प्रतीचे लोणचे तयार करता येते. करवंदांचे लोणचे आरोग्यदायी मानले जाते. मधुमेह, रक्तदाब, अपचन, हायपर अॅसिडिटी असणार्यांना हे लाभदायक असते.
जंगलात उगवणार्या रानमेव्याच्या शोधासाठी पहाटेपासून लगबग करावी लागते. नैसर्गिक स्वाद आणि आरोग्यासाठी पोषक असतात. ग्राहकांना रानमेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तयार असतो आणि त्यातून आम्हाला हक्काचे दोन पैसे मिळतात, याचेही समाधान लाभते. शासनाने दखल घेऊन हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी.
– काळू निरगुडे, कुरुंगवाडी