हिम्मत असेल तर ईव्हीएम हटवा आणि
मतदान घेऊन दाखवा
नाशिकच्या सभेत ठाकरेंचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
अब की बार चारशे पार घोषणा भाजपावाले देत आहेत. पण त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावे, असे थेट आव्हानच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले.
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. केवळ धर्माच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. मतदानासाठी देवांचा आधार घ्यावा लागत आहे. कारण भाजपाकडे कर्तृत्व काहीच नाही सांगण्यासारखे., असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा म्हणजे भेकड पार्टी अशी निर्भत्सनाही त्यांनी केली. छत्रपती शिवरायांनी सूरतेची लूट केली. पण ती इंग्रजाची वखार होती. आज महाराष्ट्राची लूट होत असताना आमचे गद्दार शेपूट घालून बसले आहेत. असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला. महाराष्ट्रातील उद्योग पळविले जात आहेत. महाराष्ट्रासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात हे मोदींनी बंद करावे. यावेळी कुसुमाग्रजांच्या कवितेचाही ठाकरेंनी दाखला देत क्रांतीची मशाल पेटविण्याचे आवाहन केले.
भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही
सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारगुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली.