अवकाळीने शेतकर्‍यांची लाखोंची हानी

इगतपुरी तालुक्यात पंचनाम्यांसाठी प्रशासनाकडून थंड प्रतिसाद

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात मे महिन्यात सलग 15 दिवस अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हानी झाली. त्यातच कृषी विभागाचे अधिकारी व तलाठी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचून पावसाने हानी झालेल्या पिके, भाजीपाल्यांचा अद्याप पंचनामा न केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील बेलगाव तर्‍हाळे, टाकेद परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेे. पावसाने वेळेआधी हजेरी लावल्याने काढणीसाठी तयार असलेली बाजरी, भुईमूग, टोमॅटो, मका, फ्लॉवर, कांदा, कोथिंबीर आणि भाजीपाला यांसारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
बेलगाव तर्‍हाळे येथील शेतकर्‍यांची शेतातील पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. या शेतीत बाजरी, भुईमूग आदींसह विविध प्रकारचा भाजीपाला मोठ्या मेहनतीने तयार केला होता. मात्र, पावसामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतात पाणी साचल्याने उर्वरित पीकही सडण्याच्या मार्गावर आहे.
शेतकर्‍यांनी वेळेवर कृषी विभागाला माहिती दिली असतानाही आतापर्यंत पंचनाम्यासाठी कोणीही आलेले नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शेतकर्‍यांनी शासनाकडे तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. अगोदरच शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. एकीकडे बँका, सोसायटीच्या कर्जाची रक्कम कशी उभी करायची या विवंचनेत असतानाच, या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे जगणेे असह्य झाले आहे. तालुक्यातील अनेक भागांत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

कृषी विभाग बांधावर पोहोचेना
प्रशासनाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित आहे. कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी अद्यापपर्यंत न पोहोचल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *