चोरट्यांचा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास
सटाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील अंबासन येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोडी करत गावात धुमाकूळ घातला. या घटनेत
सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड चोरून नेल्याचे समजते.
जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील अंबासन येथे मध्यरात्रीच्या सुमारास कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी एक कृषी सेवा केंद्र व चार वेगवेगळ्या घरांना लक्ष्य केले. संबंधित कुटुंबे बाहेरगावी गेल्यावर चोरट्यांनी घराचे दरवाजे व खिडक्या तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी महेंद्र कोर यांचे मे.जाणता राजा कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून प्रवेश केला. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. चोरट्यांनी किती रक्कम पळवून नेली हे समजू शकले नाही. चोरट्यांनी बस स्थानकाजवळील भाऊसाहेब कोर यांच्या बंगल्याच्या मागील बाजूने किचनचा दरवाजा तोडून सुमारे तीन ते चार लाखांपेक्षा अधिक रुपयांचे सोने चोरले, तर त्यांचे बंधू गंगाधर कोर यांच्या घरातून स्थानिक सोसायटीतून उचलेले 85 हजार व घरातील रक्कम अशी एक लाख तीस हजारांची रोकड लंपास केली. श्री. कोर लग्नसमारंभासाठी नाशिक येथे गेले होते, तर संतोष माळी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोने व काही रक्कम लंपास केली. संतोष माळी यांचे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने नेमकी किती सोने व रक्कम चोरून नेली, हे कळू शकले नाही. मनोज खैरनार यांनी आदल्या दिवशीच घराला पावसामुळे गळती लागली म्हणून दुसर्या घरात राहायला गेल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे सांगितले. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक संदिप चेडे, नानासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांकडून गस्त बंदच
अंबासनसह परिसरात अनेक वर्षांपासून जायखेडा पोलिसांकडून
रात्रीची होणारी गस्त बंदच असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाकडून गावात गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.