मालेगावला अपघातांत पाच तरुणांचा मृत्यू

मालेगाव : प्रतिनिधी
येथील मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी (दि. 7) दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच तरुणांचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. एकीकडे शहरात बकरी ईदचा सण आनंदात साजरा होत असताना पाच तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील रमजानपुरा येथील मोहम्मद मोहसिन इब्राहिम (20), मोहम्मद मुजीब मेहबुब शेख आणि मोहम्मद शाहिद अब्दुल रेहमान (19) हे तिघे एकाच दुचाकीवरून फिरायला गेले होते. ते आग्रा महामार्गावरील हॉटेल रॉयलजवळ दुपारी चारच्या सुमारास आले असता मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मोहसिनचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मुजीब आणि शाहीद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री उशिरा उपचारादरम्यान मोहम्मद मुजीब मेहबुब शेख याचाही मृत्यू झाला. त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ग्रीन प्लाझाजवळ दुसरी घटना घडली. या अपघातात अन्सारी मोहम्मद सायन जावेद अख्तर (20), शेख समीर शेख साजिद (19) आणि मो. केफ जमील अहमद (18) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघे अमनपुरा येथील रहिवासी होते. या भीषण अपघातांमध्ये शहरातील पाच तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *