दोन लोकलमध्ये प्रवाशांच्या बॅगा घासल्या; आठ जखमी
मुंबई : प्रतिनिधी
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सोमवारी (दि. 9) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास 13 जण रेल्वेमधून पडले. कसार्याहून सीएसएमटीला जाणार्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला.
हा अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची सांगण्यात येत होते. मात्र पुष्पक एक्स्प्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. लोकलमधून प्रवासी
फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एका ट्रॅकवरून सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसर्या ट्रॅकवरून कसार्याच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. मुंब्रा आणि दिवादरम्यान ही घटना घडली. अप आणि डाउन दरम्यानच्या लोकलमधील काही प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. अशात त्यांची धडक झाली किंवा बॅग लागला आणि आठ प्रवासी खाली पडले.
रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाइनचे नियोजन केले आहे. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाइनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. कार्यालयांनादेखील कार्यालयीन वेळेत बदल करण्याची विनंती केली होती. लोकांचादेखील सहयोग गरजेचा आहे. उपाययोजना आपण करत आहोत. पश्चिम आणि मध्यमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत, अशी माहिती डॉ. निला यांनी दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये राहुल संतोष गुप्ता (वय 28, रा. दिवा), सरोज केतन (23, रा. उल्हासनगर), मयूर शाह (44), मच्छिद्र मधुकर गोतरणे (वय 31, पोलीस कॉन्स्टेबल) यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्किंगची व्यवस्था नाही. बाहेरून कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलै पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे सर्वज्ञात असताना अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी. मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेर्या वाढवाव्यात, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ऑटोमेटिक दरवाजे नियमित लोकल ट्रेन्सना शक्य नाही, लोक गुदमरतील, श्वास घेता येणार नाही. दिवा, मुंब्रा, कळव्याची लोकसंख्या प्रचंड वाढली, त्या तुलनेत रेल्वे आणि रेल्वे फेर्या वाढल्या नाहीत. पारसिक बोगद्यात तीन पोल अतिशय चिकटून असून त्याला चिकटून हजार लोक मेले असतील पण तो पोल हटवला जात नाही, असा आरोप केला आहे. माजी आमदार विद्या चव्हाण यांनी अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती, अशा आरोप केला आहे.
अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय
नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर बसवणार
सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार सुरू
कल्याण- कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाइन, तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाइन नियोजित
ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाइनपर्यंत अपग्रेड करणार
सरकारी आणि खासगी कार्यालयांनी एकच ऑफिस टाइम न ठेवता वेगवेगळे इन-आउट टाइम ठेवावेत.
रेल्वे प्रशासनकडून चालती गाडी पकडणे धोकादायक असल्याचे नियमित कळवले जाते. त्याबाबतचे फलकही लावलेले जातात. मात्र, प्रवासी निष्काळजीपणा करून आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्रशासन प्रवासादरम्यान ज्या सूचना करतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
– सचिन बनकर प्रभारी निरीक्षक, लोहमार्ग पोलिस ठाणे