दुष्काळी येवल्यातून चार हजार टन द्राक्ष युरोपात!

चारशे शेतकर्‍यांना 27 कोटींची कमाई, शेततळ्यासह पाटाच्या पाण्याची किमया

नाशिक, येवला : प्रतिनिधी
येवल्यातील प्रयोगशील शेतकर्‍यांनी हिमतीवर अनेक प्रयोग यशस्वी केले आहे. आठमाही शेती असली तरी पालखेड डावा कालवा आणि शेततळ्याच्या पाण्यावर शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष, मका, कांदे पिकवतात. दुष्काळाच्या माहेरघरातील बागायतदारांचा पट्टा असलेल्या पाटोदा, मुखेड भागातील तब्बल 400 शेतकर्‍यांनी यंदा सुमारे चार हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केली. यातून 27 कोटी रुपयांचे चलन या शेतकर्‍यांना मिळाले.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चार हजार टन पिकवलेले द्राक्ष थेट नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, नार्वे, स्वीडन, स्पेन, डेन्मार्क, रशिया आदी देशांमध्ये पोहोचली. मागील वर्षाच्या दुष्काळाची झळ सुरुवातीला द्राक्ष हंगामाला बसली. त्यातच सुरुवातीला पावसाळा लांबला होता. त्यानंतर सरतेशेवटी पाऊस पडून त्याचा परिणाम द्राक्षांच्या गुणवत्तेवर झाला. ऐन निर्यात हंगाम सुरू झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यातीला फटका बसला, पण दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरू झाली, तरीही यंदा राज्यातून 31 मार्च 2025 अखेरपर्यंत 1 लाख 56 हजार 359 टन द्राक्ष निर्यात केली आहे. तालुक्यात तर सुरुवातीपासून अत्यल्प पावसाचा फटका द्राक्षबागांना बसला, तरी कधी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी, तर सरतेशेवटी कृषी विभागाच्या माध्यमातून साकारलेल्या शेततळ्यातील पाण्यावर शेतकर्‍यांनी बागा फुलवल्या अन् जिद्दीने शेतकर्‍यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकवलीच.
यंदा येवल्यामध्ये द्राक्ष निर्यातीसाठी पाचशे सात शेतकर्‍यांनी नूतनीकरण केले.

 

असे मिळाले उत्पन्न

तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटोदा, पिंपरी, सोमठाणे, मुखेड, मानोरी आदी

परिसरातच सर्वाधिक द्राक्षबागा आहेत. या भागातील 395 शेतकर्‍यांनी

यंदा द्राक्ष परदेशात पाठवली.214 हेक्टरवरील तब्बल 3 हजार 843 टन

द्राक्ष निर्यात झाली. द्राक्षाला 60 ते 120 रुपयांपर्यंतचा दर मिळाला,

तर सरासरी 70 रुपये प्रतिकिलोला दरमिळाल्याने तब्बल 26 कोटी 90 लाख

रुपयांचे चलन या द्राक्षनिर्यातीत शेतकर्‍यांच्या खिशात पडले आहे.

विशेष म्हणजे, मागील आठ वर्षांत सर्वाधिक द्राक्ष निर्यात मागील वर्षी

दुष्काळ असूनही झाली होती, तर यंदा हवामान व पाऊस चांगला असूनही

सुमारे 800 टन घट होऊन पाच कोटी रुपयांच्या परकीय मूल्यातही घट झाली आहे.

 

येवला तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहेत. त्यामुळे टंचाई, दुष्काळ, हवामान या सगळ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून येथे उत्तम शेती पिकवली जाते. शेतकर्‍यांनी गुणवत्ता जपली म्हणूनच द्राक्ष निर्यातीला वाव मिळाला. मागील दहा वर्षांत द्राक्ष निर्यातीचा आलेख उंचावत राहिला असून, कृषी विभागाचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले.
-शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला

पालखेडचे आवर्तन, शेततळ्याचे पाणी आणि शेतकर्‍यांची जिद्द यामुळे निर्यातक्षम विक्रमी प्रमाणात द्राक्षाचे उत्पन्न पिकविले. मेहनत, जिद्द व निगा राखल्याने यावर्षी रासायनिक अंश विरहित द्राक्ष शेतकर्‍यांनी पिकवले. थोडी घट झाली असली तरी निर्यातीचे आकडे समाधानकारक आहे. भावही चांगला मिळाल्याने चांगले चलन शेतकर्‍यांच्या खिशात पडले.
– साईनाथ कालेकर, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर, कृषी विभाग, येवला

द्राक्ष निर्यातीचे आकडे
2015 16 400  – टन
2016 17 1800  – टन
2017 18 2873  – टन
2018 19 2800 –  टन
2019 20 3786  – टन
2020 21 2771   –  टन
2021 22 3900  – टन
2022 23 3977  – टन
2023 24 4595  –  टन
2023 24 3843  – टन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *