प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली, खेळली, लहानाची मोठी झाली. ते सारे काही क्षणात तिला परके होते. परकेपणा हा तिच्यासाठी किती असावा? कधीकाळी जे घर तिचं होतं सासरी गेल्यानंतर त्या घरी येतानासुुद्धा तिला थोरामोठ्यांची संमती घ्यावी लागते. कारण या स्त्रीवर घातल्या गेलेल्या मर्यादा आहेत. काही बंधने आहेत. तेही ती पाळत असते. माहेरचा चांगला उद्धार व्हावा त्यासाठी स्वतःला एक संस्कारी स्त्री सिद्ध व्हावी म्हणून ती प्रयत्न करत असते. आठवण आल्यास माहेरचा प्रेमळ ओलावा कधी ती तिच्या अश्रूंनी टिपत असते.
सासरी गेल्यानंतर ती सासरच्या लोकांना आपलं मानते. अखेर तिच्यासाठी ते सारे विश्व असते, परंतु ज्यावेळी ती आपल्या सासरी रमते, नांदते, सुखी संसाराचे स्वप्न बघते, तसेच या स्वप्नात रंग भरण्यासाठी सर्व कुटुंबीय तिला सहाय्य करतात, तेव्हा खर्या अर्थाने ती सगळ्यांची होते.. आणि तिने बघितलेलं स्वप्न आणखीनच दिवसेंदिवस खुलत जाते. तीही त्यात बंदिस्त होत जाते समाधानाने. सासर कधी आपले होते व सासरचे कधी आपलेसे होतात हे तिचेही तिला कळत नाही. इतकी एकनिष्ठ एकरूप ती तिच्या घरात होते. तिच्या या विश्वात ती स्वच्छंदपणे रममाण होते. अशा वेळी कळत नकळत ती तिच्या माहेरची उणीव भरून काढत असते.
परिस्थिती जरा याउलट असली तर मात्र तिने मानलेले सारे विश्व, सारे स्वप्न हे विस्कळीत होतात.. तिचं अख्ख जगच पालटून जातं. ज्या आशेवर ती सासरी जाते तिची आशा, ती उमेद त्यावेळी कुचकामी ठरते. ती ना सासरच्यांना आपली करू शकली, सासरी टाकलेली सप्तपदीची सात पावलं घेऊन ती पुन्हा माहेरी माघार घेऊ शकत नाही.. अशी स्थिती उद्भवते. अशा अवस्थेत तिला निवडलेल्या जोडीदाराची साथ मिळाली तर ती नक्कीच खंबीरपणे आलेल्या आव्हानांना सामोरे जाऊ शकते. परंतु तिने आधार मानलेला तो आधारस्तंभ जर कमकुवत असेल तर मात्र ती कोणत्याही स्वप्नांच्या दुनियेत ती एकटी तिने चितारलेल्या त्या चित्रात ती रंग भरू शकत नाही.. अशा अवस्थेत मुलीने काय करावे? हाही मोठा प्रश्नच तिच्यापुढे असतो. प्रश्नचिन्ह संपता संपत नाही. मिळणार्या उत्तरालाही पूर्णविराम देता येत नाही.
आजची मुलगी शिकली-सवरली. पण ती थोडी हळवी राहिली. त्यामुळे ती कठीण प्रसंगांना कठोर होऊन समोर जाण्यास दुर्बल ठरते. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. अशा प्रसंगी ती निराशेच्या गर्द दरीत अडकते. भावनांना कवटाळून बसते. माहेरची वाट ही कदाचित तिच्यासाठी बंद वाटते. म्हणून कदाचित सारे मार्ग तिला बंद वाटतात आणि निराशेच्या गर्द काळोखात अविचार येतात. अशा अविचारांना कधी ती बळी पडते.
म्हणून मुलींनो खंबीर व्हा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. एक निर्णय चुकला म्हणून सारे आयुष्य संपत नसतं. तुमच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन तुमच्या अडचणी सांगा. आणि असे असल्यावरही कुटुंबीय तुमची साथ देत नसतील तर तुम्ही स्वतः खंबीर होऊन स्वतःचे निर्णय घ्या. स्वबळावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. मेहनत करा. समाजात जिद्दीने आपला नावलौकिक करा. खंबीरपणाने घेतलेल्या एका निर्णयात तुमच्या मेहनतीला यश मिळाले तर सर्व विश्व कवेत घेता येते. जिद्दीने, धैर्याने आकाशाला निर्भीडपणे गवसणी घालता येते. गरज आहे आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याची.. थोडा संयम, थोडी हिंमत सोबत राखण्याची..