एक किलोमीटर अटीचा संभ्रम संपला; पालकांना दिलासा
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास कुटुंबांतील पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी राज्य सरकारने लादलेल्या एक किलोमीटर अंतराच्या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार दणका दिला आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी नवे परिपत्रक जारी केले आहे.
आता तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतराचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा नवीन अर्ज भरण्यासाठी 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य शासनाने 12 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे आरटीई प्रवेश प्रक्रियेत एक नवी अट घातली, ज्यानुसार विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून केवळ एक किलोमीटरच्या परिसरातील खासगी शाळाच निवडता येत होती. या निर्णयामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये खासगी शाळांची उपलब्धता मर्यादित असल्याने अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अट मोठा अडसर ठरणार होती. नाशिकच्या दिंडोरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये तर एक किलोमीटरच्या परिसरात खासगी विनाअनुदानित शाळाच अस्तित्वात नाहीत. अशा परिस्थितीत ही अट म्हणजे आरटीईचा लाभच काढून घेण्यासारखे होते.
नक्की काय बदलले?
न्यायालयाच्या आदेशानंतर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तातडीने परिपत्रक जारी केले. त्यानुसार झालेले महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत:
पहिला बदल- अंतराचे नवे पर्याय : आता पालकांना आपल्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिसरातील खासगी विनाअनुदानित शाळांमधून पर्याय निवडता येतील. जर तीन किलोमीटरच्या परिसरात पुरेशा शाळा उपलब्ध नसतील, तर पाच किलोमीटर परिसरापर्यंतच्या शाळांचाही पर्याय खुला राहील. विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दुसरा बदल- ऑनलाइन पोर्टलमध्ये बदल :
अधिकृत पोर्टलवर तांत्रिक बदल करण्यात आले असून, आता नव्या अंतर निकषानुसार शाळांची यादी दिसेल. न्यायालयाने सरकारला ऑनलाइन सिस्टिममध्ये बदल केल्यानंतर पालकांना पुरेसा वेळ देण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्याचे निर्देश दिले.
तिसरा बदल- मुदतवाढ :
पालकांना अर्ज भरण्यासाठी येणार्या अडचणी लक्षात घेता शिक्षण विभागाने 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या पालकांनी आधीच अर्ज केला आहे, त्यांनाही त्यात दुरुस्ती करता येणार आहे आणि ज्यांनी अजून अर्ज केला नाही, ते नवीन अर्ज करू शकतात.
पालकांना आवाहन ः ज्या पालकांचे मूल 3 ते 6 वर्षे वयाचे आहे आणि कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित आहे, त्यांनी 25 मार्च 2026 पूर्वी nydu student.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करावा. हा अर्ज पूर्णपणे मोफत आहे, कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा हा हक्क तुम्हाला मोफत मिळतो.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…