शहरात पावसाची तुफान बॅटिंग

रस्त्यांवर पाणीच पाणी, दिवसभरात 42.1 मिमी पाऊस

नाशिक : प्रतिनिधी
शहर आणि परिसरात काल (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधारेमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तीन तासांत 28.7 मिमी. तर दिवसभरात 42.1 मिलिमीटर पाऊस झाला. आजपासून शाळा सुरू होणार असल्याने काल शालेय साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे चांगलेच हाल झाले.

मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर काल पहिल्यांदाच या हंगामातील जोरदार पाऊस झाला. दुपारपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी साडेचारच्या सुमाराला पावसाने प्रारंभ केला. साडेपाच वाजेपर्यंत धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहिले.
मेनरोड, कानडे मारुती लेन, पिंपळपार चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पंचवटी, कॅनडा कॉर्नर, म्हसरूळ या भागांत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने या पाण्यातून वाहने काढताना नागरिकांना तारेवरील कसरत करावी लागली. शहरात काल एकाच तासात
13.4 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे सर्वत्र पाणी साचले. तसेच भुयारी गटारीचे पाणीही रस्त्यावर आले. ठिकठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे पाण्याचे तळे साचले होते.

खरेदीवर पावसाचे विरजण

नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे काल शहरात शालेय साहित्याच्या खरेदीसाठी मेनरोडला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. वह्या, गणवेश, बूट, शालेय साहित्य खरेदीची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटलेली होती. मात्र, अचानक सायंकाळी पाऊस आल्याने शहराच्या विविध भागांतून शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक नागरिक दुकानांमध्येच अडकून पडले. तासभर सुरू असलेल्या पावसामुळे दुकानदारांचेही हाल झाले. रस्त्यावर दुकाने थाटून बसलेल्या विक्रेत्यांना पावसापासून साहित्य वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. मेनरोड भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचदरम्यान पावसामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. पावसामुळे रिक्षाचालकांनीही नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून नेहमीप्रमाणे गैरफायदा घेतला. यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरात तीन ते चार टक्के वाढ झाल्यामुळे पालकांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *