सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके ऐन काढणीला आल्यानंतर पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे आता बळीराजा सरकारकडे आशेने पाहत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसाने नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे. मोहोळ तालुक्यातील तरट गावात शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने नदी काठावरची शेती पाण्याखाली गेली. नदीकाठी असलेल्या ऊसासह केळी आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारीदेखील पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे.