धुवाधार पावसाने शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

सराफ बाजारातील दुकानांत पाणी; रस्त्यांना तळ्याचे स्वरूप

नाशिक : प्रतिनिधी
शहर आणि परिसरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने धुवाधार बॅटिंग करून अक्षरश: झोडपून काढले. दुपारी अडीच ते तीनपर्यंत पावसाचा जोर तीव्र असल्याने रस्त्यांना तळ्याचे आणि ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी अकरापासून गोदावरी पात्रात शहरातील विविध भागांतून अति तीव्रतेने पावसाचे पाणी येत असल्याने पाहता-पाहता नदीपात्राची व्याप्ती कमालीची वाढली. सराफ बाजारातील दुकानांमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान होऊन प्रचंड हाल झाले. नदीकिनारी घरांमध्येही पाणी शिरून नागरिकांची तारांबळ उडाली.शहराच्या काही भागात झाडे कोसळली तर जुन्या नाशकात वाडा पडल्याची घटना घडली. गोदावरीला आलेल्या पुरामुळे कार अडकली होती.

शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले. शहरातील रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतुकीवर याचा परिणाम झाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मे महिन्यात झालेल्या पावसात शहरातील विविध भागांत दोनशे ब्लॅक स्पॉटची यादी तयार केली होती. मात्र, अद्यापही सदर ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना करत होते. अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नदीकिनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पंचवटीतील रामकुंड परिसरातील धार्मिक विधी कार्यक्रम बंद करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *