शेतकरी हवालदिल;भाजीपाला शंभरी पार
मनमाड : प्रतिनिधी
काही भागात झालेली अतिवृष्टी, खराब हवामान तसेच सध्या सुरू असलेला पितरपाठ यामुळे छोट्यापासून मोठ्या शहरापर्यंत भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता भाजीपालादेखील महाग झाला आहे. सर्वच भाजीपाल्याने प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. मांस, मच्छी, मटण, तेल, डाळी यांचे भावदेखील मोठ्या प्रमाणात वधारले आहेत.
याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, त्यांचे बजट कोलमडले तर दुसरीकडे दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की, ते फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली होती. आता शेतकर्यांच्या मालाला भाव चांगला मिळतोय, मात्र बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसून उत्पादनात घट झाल्याने भाववाढ होऊनदेखील शेतकर्यांच्या पदरी निराशाच आहे.
सध्या देशभरात महागाईचा आगडोंब उठला आहेे. पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रतिकिलो 800 रुपये तर कोंबडीच्या मटणाचे भावदेखील प्रतिकिलो 200 रुपयांच्या उंबरठ्यावर आले आहे. वाढत्या महागाईचा सर्वांत जास्त फटका हा गोरगरीब, मजूर आणि रोज कमवून खाणार्यांना बसत आहे असून, जितक्या वेगाने महागाई वाढत आहे तेवढ्या वेगाने कमाई वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. गोरगरीब व मजुरापासून मध्यम वर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता, मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसोबत आता भाजीपालादेखील महागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्याला बसला आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊनदेखील उत्पादनात घट झाल्यामुळे खर्चदेखील निघत नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.