नीलम गोर्हे : नाशिकरोडच्या पत्रकार परिषदेत माहिती
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकमध्ये होणार्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू असून, कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षिततेसह त्यांना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली.
नाशिकरोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोर्हे यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या तयारीचा आढावा देत विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली.
प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यात काही दुर्दैवी घटनांमुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडल्याचे दाखवत गोर्हे यांनी नाशिकमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. महिला, बालक, अपंग व्यक्ती यांच्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित खोल्या, तसेच महिला आखाड्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसा पोलीस बंदोबस्त, तातडीच्या आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, विविध भाषांमध्ये माहिती प्रसारण यासाठी नियोजन करण्यात आले आहे. गोर्हे म्हणाल्या, हरवलेले भाविक सापडावेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. नाशिक शहरातील प्राचीन मंदिरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या महत्त्वाची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असून, त्यामुळे बाहेरील भाविकांना ऐतिहासिक माहिती मिळेल. स्थानिक सामाजिक संस्था, कलावंत, प्रवचनकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात येईल.
धुळे प्रकरणाची चौकशी सुरू
धुळे येथे सापडलेल्या बेहिशेबी रकमेबाबत गोर्हे यांनी सांगितले की,
या प्रकरणात सरकारने एसआयटी नेमली असून,
संबंधित रक्कम शासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपस्थित कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर टीका करत
गोर्हे म्हणाल्या, त्यांना या विषयाचा विशेष अभ्यास आहे की काय,
असेच वाटते. ‘नरकातला स्वर्ग’ या संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबत विचारले असता,
मला हे पुस्तक वाचायला वेळ मिळालेला नाही,
असे सांगत गोर्हे यांनी हसत उत्तर देत विषय टाळला.
महिला आयोगाने वेळेत दखल घेतली नाही
पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना गोर्हे म्हणाल्या,
महिला आयोगाने आणि पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता तर ही घटना टाळता आली असती. ‘
महिला तक्रार करत असल्यास पोलीस आणि आयोग दोघांनीही गंभीर दखल घेणे अत्यावश्यक आहे.