जिल्हा परिषद शाळेत नव्याने प्रवेश घेणार्‍यांना घरपट्टी माफ

मल्हारवाडी ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय

नांदगाव : प्रतिनिधी
शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मल्हारवाडी (ता. नांदगाव) ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीला नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी (कर) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याचा ग्रामपंचायतीचा हा अनोखा प्रयत्न आहे. ग्रामपंचायत सदस्या सारिका जेजुरकर यांनी यासंदर्भात सूचना मांडली. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या सूचनेचे स्वागत करत उपसरपंच दीपक खैरनार यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला. यामागे गावातील सरकारी शाळांचे बळकटीकरण, विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे आणि पालकांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा मिळणार असून, त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी शाळा निवडण्यास प्रोत्साहन मिळेल. सरकारी शाळांमधील दर्जेदार शिक्षण, अभ्यासू शिक्षकवर्ग आणि सुविधांसोबतच करमाफीसारखी योजना ग्रामीण शिक्षणाच्या विस्तारात एक मोलाचा वाटा ठरेल. अनेक पालकांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून, लवकरच शाळांमध्ये नवीन प्रवेशांची नोंदणीही वाढण्याची शक्यता आहे.

गावातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी करमाफी देण्याचा निर्णय हा शिक्षणास प्रोत्साहन देणारा ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे. सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते आणि यामुळे गावातील शाळांचा दर्जाही उंचावेल.
-दीपक तात्याराव खैरनार, उपसरपंच, मल्हारवाडी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *