मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकर्यांचा रब्बी पिकांकडे कल
पीकनिहाय पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
गहू 64,233 70,293 109 टक्के
मका 9,284 22,924 246 टक्के
ज्वारी 4,220 2,766 65 टक्के
हरभरा 33,357 29,794 89 टक्के
लासलगाव : समीर पठाण
नाशिक जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पावसामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी रब्बी पिकांकडे कल वाढवल्याने रब्बी पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रब्बी हंगामात आतापर्यंत साधारण एक लाख 30 हजार 133 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. प्रामुख्याने गहू, हरभरा, मका व कांदा या पिकांची लागवड वाढली झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीचे नियोजन कोलमडले होते. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी लांबणीवर गेली. मात्र, टप्प्याटप्प्याने उशिरा पेरणी झाली असून सरासरीपेक्षा अधिक पेरा झाला आहे. ही टक्केवारी 114 टक्के असून, गहू पेरणी सरासरीपेक्षा अधिक व मक्याची दुप्पट असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे.
गव्हाच्या पेरणीने 100 टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून, सरासरी 64,233 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 70,293 हेक्टरवर (109%) पेरणी झाली आहे. मका लागवडीत सर्वाधिक वाढ झाली आहे. सरासरी 9,284 हेक्टर क्षेत्र असताना यावर्षी 22,705 हेक्टरवर (244.56%) पेरणी झाली आहे.कडधान्यांमध्ये हरभर्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रातही सुमारे 58 टक्क्यांनी वाढ झाली असून, ते 2.24 लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात रब्बी पेरणीत साधारणपणे 37 हजार हेक्टरची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने जमिनीतील ओलावा आणि पाणीपातळी वाढवल्यामुळे शेतकर्यांनी रब्बीकडे कल वाढवला आहे. मालेगाव आणि बागलाण तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरीपेक्षा थोडे कमी असले, तरी निफाड आणि दिंडोरी तालुक्यात द्राक्षासोबतच रब्बी पिकांचे नियोजन जोरात सुरू आहे. याशिवाय मालेगाव, कळवण, सुरगाणा, इगतपुरी येथे सरासरीपेक्षा अधिक पेरणी आहे. पेरणीमध्ये मालेगाव, सिन्नर, निफाड आणि येवला या तालुक्यांनी आघाडी घेतली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. मात्र, त्या पावसाच्या रब्बी हंगामसाठी फायदा झाला आहे. पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्यांनी रब्बी पिकांकडे अधिक कल वाढवला आहे. हवामानाने साथ दिल्यास यंदा रब्बीचे उत्पादन चांगले राहील व शेतकर्यांच्या पदरी दोन पैसे अधिकचे मिळतील, अशी अपेक्षा आहे.
– राजाबाबा होळकर,
शेतकरी, लासलगावयंदा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गहू, हरभरा त्याचप्रमाणे कांदा पिकाचीदेखील लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा एकंदर परिणाम चांगल्या उत्पादनावर होणार आहे. पुढे हवामान खराब न राहिल्यास रब्बीचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे
– सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव
Increase in rabi area in Nashik district