पंचवटी : वार्ताहर
पंचवटी सह परिसरात अनेक ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग लागल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे शहराच्या विद्रुपीकणरणातही वाढ होत आहे . इतकेच नव्हे होर्डिंगच्या माध्यमातून मनपाला मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील पाणी फिरत आहे .याकडे मनपा प्रशासक तथा आयुक्त लक्ष देणार का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडत आहे .
शहरासह पंचवटी तसेच शहरातील ग्रामीण भागात अनाधिकृत होर्डिंग्ज लागल्याचे चित्र दिसत असून यामुळे न्यायालयाचा देखील अवमान होत आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार होर्डिंग लावण्यासाठी मनपाच्या संबधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना देखील होर्डिंग लावताना परवानगी घेत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे . अधिकृत होर्डिंग लावण्यासाठी महानगरपालिकेने जागा निश्चित केल्या असून त्या ठिकाणी अधिकृत होर्डिंग लागले जातात .परंतु आजही शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला अनधिकृत होर्डिंग लावले जात आहेत . अनेक ठिकाणी तर वळणावर होर्डिंग लावले जात असल्याने वाहन चालकांना देखील त्याचा त्रास होत आहे. अधिकृत होर्डिंग लावण्यासाठी मनपात असलेला कर विभाग करतो काय असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होतो किंवा असे अनाधिकृत होर्डिंग्ज मनपाच्या संबधित विभागाच्या आशीर्वादानेच लागतात का ? हा देखील प्रश्न पडतो . अनेक ठिकाणी बरेच होर्डिंग बरेच दिवसांपासून लागल्याचे चित्र दिसत आहे . अशा होर्डिंगकडे मनपाचे लक्ष जात नसेल का ? किंवा याकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे .
तत्कालीन पोलीस आयुक्त पांडेय यांची येते आठवण !
नाशिक शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपककुमार पांडेय यांची यानिमित्ताने आठवण आल्याशिवाय राहत नाही. पांडेय यांनी शहरात कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यासाठी नियम घालून दिले होते . त्यावेळी शहर होर्डिंगमुक्त झाल्याचे चित्र आठवते . त्यावेळी शहराने देखील मोकळा श्वास घेतला होता . परंतु आज हेच चित्र उलटे झाले आहे . ठिकठिकाणी लागलेल्या अनाधिकृत होर्डिंग लागल्याचे बघायला मिळत आहेत . तर सध्या महानगरपालिकेत प्रशासक असून ते तरी शहर होर्डिंग मुक्त करतील का हे बघावे लागणार आहे
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.