महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत 1905 ते 1956 अशी पाच दशके ज्यांनी समाजसुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज (दि. 23) जयंती. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, दिव्यांगांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी-मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दुःखी व हतबल असणार्यांना हिंमत देण्याची आचरणसूत्री सांगून त्यालाच रोकडा धर्म म्हणणारे गाडगेबाबा आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वातही समाजाचा आरसा बनून मार्गदर्शन करत आहेत.
संत गाडगेबाबांचा जन्म 23
फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. लहानपणी त्यांना डेबू म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखूबाई होते. आडनाव जानोरकर.लहानपणीच व्यसनाधीनतेने वडिलांचे निधन झाल्यामुळे ते आपल्या आईसोबत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी मामाकडे राहायला गेले. त्यांच्या जीवनातील प्रारंभिक काळातील संघर्षांनी, कुप्रथांनी व त्यातून आलेल्या दुःखांनी त्यांच्या मनात समाजसेवेचा आणि दीन-
दुःखितांच्या मदतीचे बीज रुजवले.शेती, माती, संसारात रमलेल्या डेबुजींना तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा व कुप्रथांनी समाजासाठी लढण्यास प्रवृत्त केले. 1905 नंतर त्यांनी कुटुंब व संसार त्यागून गावोगावी फिरून लोकांना समाजातील दोष समजावून सांगण्याचा निर्णय घेतला. केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व अन्य राज्यांतही त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे कीर्तनात्मक भजनातून अंधश्रद्धा निर्मूलन केले. आपल्या वर्हाडी भाषेत सहज विनोदाची, संवादाची पेरणी करत आणि जगण्यातील विसंगती मांडत त्यांनी कर्मकांडावर हल्ला केला.त्यांचे कीर्तन म्हणजे विवेचनकार व श्रोते यांच्यातील प्रश्नोत्तराचा सुलभ सादरीकरणाचा प्रबोधनात्मक आविष्कार होता. या अशिक्षित माणसाच्या कीर्तनाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आचार्य प्र. के. अत्रे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या विद्वानांनी खाली बसून रसग्रहण केले. साध्या सोप्या शब्दांमध्ये ते विवेचन करायचे.त्यांच्या विवेचनाला ’गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचे पार्श्वगायन असायचे. विशेष म्हणजे, संपूर्ण श्रोते भजन गायनात सहभागी व्हायचे. समाजाच्या अंधश्रद्धा, चाली, रूढी-परंपरा यावर तुटून पडण्याच्या त्यांच्या आक्रमक शैलीचे वर्णन करताना आचार्य अत्रे यांनी म्हटले होते…‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.‘
भारतीय संतपरंपरेतील क्रांतिकारक विचार मांडणार्या संत तुकाराम, संत कबीर यांच्या अभंग व दोह्यांचा अचूक वापर ते त्यांच्या कीर्तनात करायचे. कीर्तनाचा प्रारंभ हा स्वच्छता अभियानातून करणारा हा महापुरुष तत्कालीन समाजव्यवस्थेत धार्मिक पाखंडावर असूड उमटवायचा. मंदिरात देव शोधण्याऐवजी माणसातच देव शोधा, हा त्यांचा परखड संदेश होता. देव दगडात नाही, तो माणसात आहे, असे ते देवकीनंदन गोपाला हे भजन गाताना उदाहरणे देऊन व श्रोत्यांशी संवाद साधून स्पष्ट करायचे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी गाडगेबाबांच्या मैत्री आणि आदराचे संबंध होते. भाऊरावांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा उल्लेख ते आपल्या कीर्तनात करायचे. भाऊरावांनी गाडगेबाबांच्या निधनावर अतिशय भावनिक संवेदना व्यक्त केल्या होत्या. गाडगेबाबांनी आपल्या कार्याच्या शेवटच्या काळात 8 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईत सार्वजनिक कीर्तन केले. गाडगे बाबांचे शेवटचे भाषण आजही सर्वत्र उपलब्ध आहे. अशिक्षित असणार्या या समाजसुधारकाच्या जात, धर्म, स्वच्छता आणि शिक्षणाबाबतच्या कल्पना किती स्पष्ट होत्या. क्रांतिकारी होत्या, याची जाणीव आजही समाजाला ठेवणे गरजेचे आहे. देशाने अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केल्यानंतरही
त्यांचे विचार आजही कालसापेक्ष आहे. गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजसेवा केली. मात्र, स्वतःच्या नावाने आश्रम, मठ उभारणे त्यांना मान्य नव्हते. ते स्वतः म्हणायचे, ‘मी कुणाचा गुरू नाही. माझा कुणी चेला नाही.‘ 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव (जि. अमरावती) येथे हा महान सुधारक अंतिम प्रवासासाठी प्रस्थान करता झाला.त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता व पाण्याच्या पुरस्कार योजना सुरू केल्या आहेत. अमरावती विद्यापीठाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ठेवण्यात आले आहे, हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे.
Karmayogi Saint Gadge Baba and Social Enlightenment