कोकणगाव-निसाका रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

वडाळी नजीक रस्त्यावर अर्धवट खड्डे; ग्रामस्थांमध्ये संताप

कसबे सुकेणे : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कोकणगाव-वडाळी नजीक ते निफाड कारखाना रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे आणि अर्धवट खोदलेले रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. ठेकेदाराने किंवा संबंधित विभागाने त्याची योग्य डागडुजी न करता तो तसाच सोडून दिला आहे, असा आरोप संतप्त वडाळी नजीक येथील ग्रामस्थांनी केला आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग असलेला हा रस्ता निफाड आणि दिंडोरी तालुक्याला जोडणारा असून, गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे अर्धवट काम करून ठिकठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. वडाळी नजीक ते निसाकादरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरणे, समोरासमोर अपघात होणे, असे प्रकार होत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, अपूर्णावस्थेत असल्याचा आरोप वडाळी नजीक येथील गोकुळ झाल्टे, सुनील कडलग, राकेश झाल्टे, तुषार झाल्टे, सतीश झाल्टे, राजेंद्र घोलप, दत्तू झाल्टे, संजय घोलप, रोहिदास कोरडे, चेतन घोलप, रवींद्र पगार, प्रकाश शिंदे, संजय झाल्टे, मनोज राजोळे आदींसह वडाळी नजीक, भाऊसाहेबनगर, कोकणगाव, शिरसगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. अपघात होत असून, संबंधित विभागाने दखल घेऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
– राजेंद्र घोलप, ग्रामस्थ, वडाळी नजीक
रस्त्याचे काम अपूर्ण ठेवणार्‍या ठेकेदारावर कारवाई व्हावी, हा रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा संपूर्ण वडाळी गाव निफाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल.
– गोकुळ झाल्टे, वडाळी नजीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *