नाशिक : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी रामकाल पथच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये निविदा काढून कामांना मुहूर्त लावला आहे. दरम्यान, काही ठिकाणी ‘रामकाल’ला जागेअभावी अडचण येत असल्याने त्यासाठी महापालिकेने जमीन भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
पंचवटी परिसरातील रामकाल पथ विकास प्रकल्पासाठी मनपाने जमीन संपादन प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात महापालिकेकडून सूचना प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने संबंधित जमीनमालकांनी स्वतःहून नगरविकास विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तातडीने मनपाशी सहकार्य करावे. अन्यथा, ही जमीन अधिग्रहित करण्याची व बोलीप्रक्रियेतून पुढील कारवाई करण्याची वेळ येईल, असेही सुचविले आहे. तसेच जमिनीसंबंधी इतर कोणतेही दावे, हक्क, वाद, दानपत्र, करारनामा, वारसा, विकसन करार आदी असल्यास सात दिवसांच्या आत मनपाकडे लेखी हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रामकाल पथ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागांमध्ये एकूण 1944.30 चौ.मी. क्षेत्र विकासासाठी निश्चित करण्यात आले आहे. या जमिनींचे मालकत्व अधिकार अभिलेखांप्रमाणे नोंदवले
गेले आहे.