काम पूर्ण होण्याआधीच विद्युत खांब कोसळले; स्थानिकांमध्ये भीती
कळवण : प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील जयदर सबस्टेशनवरून अंबापूर, वरखेडा, करमाळा यांसह काही आदिवासी खेड्यांवर केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेंतर्गत नवीन विद्युत मेन लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामात हलगर्जीपणा होत असल्याचे आता उघड झाले आहे. अंबापूर परिसरात अवघ्या आठ दिवसांत दोन विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकर्यांचे म्हणणे आहे की, उभारण्यात येणारे खांब पोकळ, कमकुवत व निकृष्ट दर्जाचे असून, योग्य ते मजबूत केलेले नाही. वीजपुरवठा सुरू होण्याआधीच खांब कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या राज्यमार्ग क्रमांक 21 वरून विद्युत लाइनचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला खांब उभारण्यात येत आहेत. मात्र, हे काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या रस्ते विभागाची परवानगी घेतली आहे का, हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. भविष्यात जर रस्त्याचे रुंदीकरण करावे लागले तर हे खांब रस्त्यात अडथळा ठरणार नाहीत का, याची दखल घेतलेली नाही. सापुतारा-कनाशी मार्गावरील वरखेडा फाटा ते जयदर, अर्जुन सागर मार्गावरही खांब उभारण्यात आले आहेत. मात्र सिमेंट, दगड किंवा वाळू यांचे मजबुतीकरण न करता फक्त दगडगोटे व मातीने खड्डे बुजवण्यात आले. पावसामुळे माती सरकून खांब कोसळत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात आणखी खांब कोसळण्याची शक्यता आहे.
संपूर्ण कामावर देखरेख करणार्या राज्य विद्युत महामंडळासह संबंधित विभागांनी अद्याप काहीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ठेकेदाराने भविष्यातील रस्त्यांचे नियोजन, मजबुतीकरणाची गरज आणि सुरक्षा याचा विचार केला नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
…तर जबाबदार कोण?
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर गंभीर आरोप केले असून, काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा ठपका ठेवला आहे. ‘आरडीएसएस योजनेचे उद्दिष्ट चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी ढिसाळ पद्धतीने होत आहे. भविष्यात जर अपघात झाले तर त्याला जबाबदार कोण धरणार?‘ असा सवाल नागरिकांनी केला आहे.