पिंजरा लावण्याची मागणी
पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर, याबाबत वन विभागासह परिसरातील शेतकरी देखील सर्वश्रुत आहेत. हनुमान वाडी परिसरातील श्रद्धा लॉन्स पाठीमागे बेंडकुळे मळ्यात बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले असून पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालाजी मंगेश बेंडकुळे हे हनुमानवाडी तील बेंडकुळे मळ्यात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. हे मूळ शेतकरी असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. यांचेकडे एकूण दहा ते बारा गाई असून आज रोजी दोन बछडे आहेत. मखमलाबाद व हनुमानवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याची बाब काही नवीन नाही. शुक्रवार (ता.23) रोजी पहाटे सुमारास बिबट्याने गोठ्यात असलेल्या एका वासराला फरफटत घासाच्या शेतातून जवळपास अर्धा किलोमीटर नदी कडे घेऊन गेला व त्याचा फडशा पाडला. नित्यनियमाने वासराला दूध देण्यासाठी बाहेर आले असता ते निदर्शनास आले नाही. पाहणी केले असता सदर वासरू फरफटत घेऊन गेल्याच्या खुणा दिसल्या त्यावेळी त्यांना नदीच्या कडेला मृत् अवस्थेत आढळून आले. याबाबत बेंडकुळे यांनी वन विभागाला माहिती कळविली त्यानुसार वन विभागाचे अधिकारी ठाकरे या घटनास्थळी भेट दिली. मिशनद्वारे चेक केले असता बिबट्या मादी व तिचे दोन पिल्ले अश्या पाऊल खुणा आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रथम पिंजरा लावण्यात यावा व त्यास जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
मार्च महिन्यातील 13 तारखेला होळीच्या दिवशी गायीने वासराला जन्म दिला होता.
गाय ही आजारी होती तिचेवर उपचार देखील करण्यात आले.
मात्र, ती तीन दिवसांनंतर गतप्राण झाली. त्यानंतर सदर वासरू हे पोरक झालं,
बेंडकुळे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ सुरू केला,
त्यास सकाळी व सायंकाळी त्यास दूध देत असे त्याचे जवळपास तीन महिने संगोपन केले होते.
त्याच वासराचा बिबट्याने फडशा पाडला, त्यामुळे बेंडकुळे परिवारात एकच शोककळा पसरली.