वन विभाग अॅक्शन घेणार कधी?
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडले येथील विनोद शांताराम पगार यांच्या वस्तीवर रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून वासरावर हल्ला केला. त्याच ठिकाणी बिबट्याने वासराचा फडशा पाडला. वनविभागाने सकाळी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
दिंडोरी तालुक्यात सध्या नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात वनारवाडी येथे तरुणीवर हल्ला करून ठार केले, तर दिंडोरीत जाधव वस्तीवर चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतला. वन विभागाने तालुक्यातील ज्या गावांमध्ये बिबट्याचे प्रमाण अधिक आहे, अशा गावांमध्ये जाऊन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. हल्ला झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी यांना फोनवर जणू आमंत्रण द्यावे लागते, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांमध्ये बिबट्यांचे प्रमाण अधिक आहे,
अशा गावांसाठी पिंजर्यांची संख्या वाढवून त्या गावांमध्ये पिंजरे लावावे किंवा त्या गावांसाठी पिंजरे राखीव ठेवावे. मात्र सध्या वनविभाग गाफील असल्याचे चित्र आहे. असे किती बळी बिबट्याने घेतल्यानंतर वनविभाग अॅक्शन मोडवर येणार, अशी चर्चा तालुक्यात होत आहे.