साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी
प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…
सद्या प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. निस्सीम प्रेम, एकनिष्ठ या गोष्टी म्हणजे अळवावरचे पाणी झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या घटनेने तर प्रेमावरचा विश्वासच उडेल, असा सारा मामला. त्याचे झाले असे की, धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणीचे गावातीलच योगेश काळे नावाच्या तरुणाशी प्रेम संबध होते. जिना मरना तेरे संग म्हणत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यामुळे दोघांचा साखरपुडाही झाला. पण साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी योगेशच्या वाग्दत्त वधुने योगेशबरोबर बोलणे टाळत योगेशच्या मित्राबरोबरच सूत जुळविले.आणि विशेष म्हणजे लग्नही केले. प्रेमात धोका मिळालेल्या योगेशच्या मनाला ही बाब जिव्हारी लागली. त्याने व्हाटसअॅपवर प्रेमात धोका मिळाला असे स्टेटस ठेवले. ते सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर योगेशचे रोहित बागल, चेतन माने, सत्यवान चादरे यांनी अपहरण केले. जंगलात घेऊन जात त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.